अ‍ॅपशहर

कवी विष्णू थोरे यांची कविता चित्रपटात

चित्रपटासाठी स्वतंत्र गाणी लिहिणं आणि एखाद्या कवितेचं गाणं होऊन ते चित्रपटात जाणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कथानक डोळ्यासमोर असलं की त्यावरून गाणं लिहिणं हे गीतकाराचं कसब असतं.

प्रशांत भरवीरकर | Maharashtra Times 28 Oct 2017, 4:00 am
नाशिक ः चित्रपटासाठी स्वतंत्र गाणी लिहिणं आणि एखाद्या कवितेचं गाणं होऊन ते चित्रपटात जाणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. कथानक डोळ्यासमोर असलं की त्यावरून गाणं लिहिणं हे गीतकाराचं कसब असतं. परंतु, एखाद्या प्रसिद्ध कवितेचं गाणं होऊन चित्रपटात जाणं, याला नशिबच लागतं. चांदवडचे सुप्रसिद्ध कवी विष्णू थोरे यांची उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेली ‘इश्काच्या इलाजाची दवा मला पाज गं’ ही कविता रसिकांना आगामी मराठी चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम poet thores poem in film
कवी विष्णू थोरे यांची कविता चित्रपटात


अनेक कार्यक्रमांतून आपल्या कविता सादर करणारे कवी विष्णू थोरे हे गायक कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचा ‘गाव व्हिलेज झालंय’ हा कवितांचा कार्यक्रम रसिकांनी डोक्यावर घेतला. त्यातून त्यांची ओळख सर्वदूर पोहोचली. कवितेचा अस्सल ग्रामीण बाज त्यांच्या शब्दातून येतो. ना. धों. महानोर, प्रकाश होळकर यांच्याच पठडीतला कवी म्हणून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच आपल्या पिढीतले कवी ऐश्वर्य पाटेकर, दिगंबर देवढे, संदीप जगताप यांच्यात ते आपल्या ग्रामीण कवितेच्या अस्सल रांगड्या शब्दांनी ठळक होतात. जेथेही कवितांचा कार्यक्रम होईल तेथे फर्माईश येणारी त्यांची ‘मनातल्या गुप‌िताचं खोल तू राज गं...इश्काच्या इलाजाची दवा मला पाज गं’ ही कविता आगामी मराठी चित्रपटातून येणार आहे. मालेगाव तालुक्यातील सोनज गावातील मोहन घोंगडे मुंबईला शिवमल्हार प्रॉडक्शन या बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. त्यात ही कविता गाणं म्हणून घेण्यात आली आहे. प्रथितयश गायकाकडून ही कविता गाऊन घेण्यात येणार असल्याचे प्रॉडक्शनतर्फे सांगण्यात आले आहे.

कवी विष्णू थोरे यांनी ‘घाटी’ या आगामी मराठी चित्रपटासाठीदेखील गीते लिहिली असून ‘चिंगात चिंगली, भिंगात भिंगली, नशा पैशाची ही खोटी, मर्द खरा शोभतो हा घाटी’ हे ते गाणे असून ‘फडफड करतंय जीवाचं पाखरू, लागलंय रूप तुझं काळजाला पोखरू, चांद देखणार डोळ्यात गुतला, काटा इश्काचा रूतला’ हे गाणेदेखील चित्रपटातून लवकरच येत आहे.


कवितेचा शब्द खणखणीत असला की त्याचे गाणे होते. लय, मीटर, शब्दकळा या बाबी मागावून येतात. कवितेचे गाणे होणे ही माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे. एक काळ असा होता की चित्रपटासाठी पैसे नसायचे. आज चित्रपटात आपले गाणे जातेय यापेक्षा मोठा गौरव तो कोणता?

-विष्णू थोरे, कवी व गीतकार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज