सरकारकडे ७०० किलोंची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
बाजारपेठेत तूर डाळीचे दर प्रतिकिलो ९० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले असून सर्वसामान्यांच्या ताटातून वरण गायब होण्याची शक्यता बळावली आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंब तसेच अंत्योदय लाभार्थींना तूर डाळ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने सरकारकडे ७०० क्विंटल तूर डाळीची मागणी केली आहे. ही डाळ प्राप्त झाल्यास ती ५५ रुपये प्रतिकिलो दराने मिळू शकणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर डाळींचे उत्पादन घेतले जाते. मध्य प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणावर डाळ येते. परंतु, यंदा डाळींच्या उत्पादनालाही अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक ठिकाणी हाता तोंडाशी आलेली कडधान्ये पावसामुळे आडवी झाली. त्यामुळे तूर डाळीचे दर पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत. सध्या बाजारपेठेत ९० ते १०० रुपये प्रति किलो दराने तूर डाळीची विक्री होते आहे. किराणा दुकानांत उडीद डाळ १२० रुपये तर मूगडाळ ११० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
गत आठवडाभरात डाळींच्या किंमतीत प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली. बाजारपेठेत डाळींचा तुटवडाही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रेशनच्या ग्राहकांना सवलतीच्या दरात तूर डाळ मिळावी, याकरीता जिल्हा पुरवठा विभागाने ७०० क्विंटल तूर डाळीची मागणी केली आहे. या आठवड्यात डाळ प्राप्त होईल, अशी शक्यता या विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपयांत एक किलो तूरडाळ मिळू शकणार आहे.
तूरडाळीचे दर वाढत असून तूर्तास तरी जिल्ह्यात काळाबाजार होत असल्याचे ऐकीवात नाही. कारवाईबाबत सरकारकडून सूचनाही प्राप्त झालेल्या नाहीत. आम्ही सरकारकडे ७०० क्विंटल तूर डाळीची मागणी नोंदविली असून या आठवड्यात डाळ प्राप्त होण्याची शक्यता आहे.
- डॉ. अरविंद नरसीकर,
जिल्हा पुरवठा अधिकारी
सरकार तूर डाळ देणार असले तरी निकृष्ट दर्जाची असणार नाही याची काळजी घेतली जावी. अशी डाळ ग्राहक खरेदी करत नाहीत. त्यामुळे तिची विक्री कशी करावी याची चिंता रेशन दुकानदारांना सतावते.
- निवृत्ती कापसे,
अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना