अ‍ॅपशहर

रेल्वे स्टेशन होणार मॉलसारखे चकाचक

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून राज्यातील अनेक रेल्वे मार्ग त्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत.

फणिंद्र मंडलिक | Maharashtra Times 8 Jun 2017, 4:00 am
नाशिकः महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून राज्यातील अनेक रेल्वे मार्ग त्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे भारतातील निवडक रेल्वे स्टेशन ‘स्विस चॅलेंज मेथड’च्या धर्तीवर विकस‌ित केले जाणार असून, त्यात नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. सध्या असलेले स्टेशन बहुमजली होणार असून त्याला मॉलचा दर्जा प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway station developing
रेल्वे स्टेशन होणार मॉलसारखे चकाचक


नाशिकरोड रेल्वे स्थानक हे उत्तर भारताकडे सर्वात जास्त वाहतूक करणारे स्टेशन आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रवासी वाहतूक करणारे केंद्र म्हणूनदेखील याची ख्याती आहे. सिंहस्थाच्या कालावधीत नाशिकरोड रेल्वे स्टेशनला जंक्शनचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गाड्या थांबवण्यासाठी जागा नसल्याने ती बासनात गुंडाळण्यात आली. नाशिकरोड रेल्वे स्थानकाला पुरेशी जागा नसल्याने त्याचा विकास खुंटला आहे, असेही मानले जाते. परंतु, आता ती अडचण दूर होणार आहे. महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्यात करार झाला असून, लवकरच नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या उपक्रमांतर्गत भारतातील चारशे स्टेशनची निवड केली असून, त्यात नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरश‌िपच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. यात रेल्वे स्टेशन्सवर असलेली एअर स्पेस विकस‌ित करण्यात येणार असून, ग्राऊंड फ्लोअरवर रेल्वे स्टेशन, पहिल्या मजल्यावर रेल्वेची प्रशासकीय इमारत व प्रतिक्षालय, त्यानंतरचे मजले हे व्यावसायिक वापरासाठी विकासकाला देण्यात येणार आहेत.

या कामाचे पेपरवर्क तयार असून, त्यास लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. यावेळी स्विस चॅलेंज मेथडचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे यात टेंडर सिस्ट‌िम नसेल. काय हवे याची माहिती रेल्वे प्रशासन वेबसाइटवर देणार असून, जे विकासक कमी दराने काम पूर्ण करतील त्यांना काम दिले जाणार आहे. यात मध्य रेल्वेचा आणि विकासकांचा दोघांचा फायदा होणार आहे. ४५ वर्षांच्या कराराने ही स्टेशन्स विकसित केली जाणार आहेत.


मध्य रेल्वेचे नाशिक हे एक प्रमुख ठिकाण असल्याने नाशिकचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी ही योजना रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशान्वये अमलात आणण्यात येणार आहे. यासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यास लवकरच या कामाला सुरुवात होईल. नाशिककरांना परदेशातील रेल्वे स्टेशनसारखे स्टेशन मिळेल.

-नरेंद्र पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्यरेल्वे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज