म. टा. प्रतिनिधी, नाशिक
शहर व जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गोदावरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच खळाळली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोटी- सिन्नर रस्त्यावरील देवळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर सुरगाणा तालुक्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. रात्रीतून पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४४८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा जातो की काय, अशी शक्यता असताना जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटापासून बळीराजाची मुक्तता होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे सरकला असून, पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सक्रिय झाला असून, दोन दिवस मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा चांगला जोर आहे. पाण्याअभावी संकटात सापडलेल्या खरीप व भाजीपाला पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग
दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज दुपारी एकपर्यंत दारणा धरणातून ५१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी चारनंतर १२ हजार ७५१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी पावसाचा जोर ओसरताच विसर्ग कमी करण्यात आला. गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढत असून शनिवारी येथून विसर्ग करावा लागेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तेथील पाण्याचा प्रवाह गोदावरीस येऊन मिळत आहे. त्यामुळे दिवसभरात सुमारे २० हजार क्युसेक इतके पाणी गोदावरीत येऊन मिळाले. त्यामुळे पुरसदृश स्थिती निर्माण झाली.
पुलाला भगदाड; पाझरतलाव गेला वाहून
घोटी-सिन्नर मार्गावर देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तातडीने पुलाचे काम करण्याबाबत सूचना केल्या. सुरगाण्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्याने पाणी परिसरातील शेतीत शिरून नुकसान झाले. सायखेड्यात पुलाला पाणवेलींचा विळखा पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला. स्थानिक प्रशासनाने तातडीने या पाणवेली हटविण्याचे काम हाती घेतले.
तीन तालुके कोरडेच
जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर असताना मालेगावसह तीन तालुके कोरडेच राहिले, तर कळवणसह तीन तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी दिवसभरात बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुके कोरडेच राहिले, तर देवळ्यात ३.२, चांदवडमध्ये १.२ आणि येवल्यात १ मिलिमीटर पाऊस झाला.
तालुकानिहाय शुक्रवारी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पेठ ९६.२, इगतपुरी ८१, त्र्यंबकेश्वर ७८, सिन्नर ५४, सुरगाणा ४९, नाशिक ३३, निफाड २०, कळवण १०, देवळा ३.२, चांदवड १.२, येवला ०१, नांदगाव ००, मालेगाव ००, बागलाण ००.
शहर व जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, गोदावरी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच खळाळली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोटी- सिन्नर रस्त्यावरील देवळे पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, तर सुरगाणा तालुक्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. रात्रीतून पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग करावा लागण्याची शक्यता असून, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात ४४८.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा जातो की काय, अशी शक्यता असताना जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटापासून बळीराजाची मुक्तता होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशावर असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशकडे सरकला असून, पश्चिम राजस्थान ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस सक्रिय झाला असून, दोन दिवस मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत पावसाचा चांगला जोर आहे. पाण्याअभावी संकटात सापडलेल्या खरीप व भाजीपाला पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग
दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज दुपारी एकपर्यंत दारणा धरणातून ५१०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. दुपारी चारनंतर १२ हजार ७५१ क्युसेकने विसर्ग करण्यात आला. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. दुपारी पावसाचा जोर ओसरताच विसर्ग कमी करण्यात आला. गंगापूर धरणात पाण्याची पातळी वाढत असून शनिवारी येथून विसर्ग करावा लागेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने तेथील पाण्याचा प्रवाह गोदावरीस येऊन मिळत आहे. त्यामुळे दिवसभरात सुमारे २० हजार क्युसेक इतके पाणी गोदावरीत येऊन मिळाले. त्यामुळे पुरसदृश स्थिती निर्माण झाली.
पुलाला भगदाड; पाझरतलाव गेला वाहून
घोटी-सिन्नर मार्गावर देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना तातडीने पुलाचे काम करण्याबाबत सूचना केल्या. सुरगाण्यात बुडळी येथील पाझर तलाव फुटल्याने पाणी परिसरातील शेतीत शिरून नुकसान झाले. सायखेड्यात पुलाला पाणवेलींचा विळखा पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला. स्थानिक प्रशासनाने तातडीने या पाणवेली हटविण्याचे काम हाती घेतले.
तीन तालुके कोरडेच
जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पावसाचा जोर असताना मालेगावसह तीन तालुके कोरडेच राहिले, तर कळवणसह तीन तालुक्यांत अत्यल्प पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सहा तालुक्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी दिवसभरात बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुके कोरडेच राहिले, तर देवळ्यात ३.२, चांदवडमध्ये १.२ आणि येवल्यात १ मिलिमीटर पाऊस झाला.
तालुकानिहाय शुक्रवारी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
पेठ ९६.२, इगतपुरी ८१, त्र्यंबकेश्वर ७८, सिन्नर ५४, सुरगाणा ४९, नाशिक ३३, निफाड २०, कळवण १०, देवळा ३.२, चांदवड १.२, येवला ०१, नांदगाव ००, मालेगाव ००, बागलाण ००.