म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
लोकसभा निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला असून, शेवटचे आठ दिवस प्रशासन व राजकीय पक्षांना तापदायक ठरणार आहे. या आठ दिवसांत प्रचाराच्या रणधुमाळीत मोठ्या नेत्यांच्या सभांबरोबरच रॅली व मतदानाची तयारी केली जाणार आहे. गेले काही दिवस प्रचार सुरू असला तरी त्यात अद्याप तितकी रंगत आलेली नाही. अनेक ठिकाणी वातावरणनिर्मितीही झाली नाही. पण, उमेदवारांनी प्रचार फेऱ्या करुन आता प्रचाराचे रान उठवल्यानंतर आता निवडणुकीचे वातावरण सर्वत्र तयार होत आहे.
जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी या मतदार संघांत २९ एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळे २० एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंतच प्रचाराला वेळ मिळणार आहे. त्यामुळे या आठ दिवसांत हा प्रचार करण्यासाठी राजकीय पक्ष विविध हातकंडे वापरणार आहे. २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव येथे आहे. त्याची सर्वांना उत्सुकता आहे. या सभेनंतर २४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सर्व सभा झाल्यानंतर २६ एप्रिल रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा आहे. त्यामुळे या सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, वंचित बहुजन विकास आघाडी, माकपही सभेच्या माध्यमातून रंग भरणार आहे.
रॅलीत होणार शक्तिप्रदर्शन
प्रचार सभेनंतर अखेरच्या टप्प्यात रॅली काढल्या जाणार आहेत. त्यात प्रत्येक पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहे. या रॅलीतून आपली ताकद दाखवण्याची संधी सर्वांना असणार आहे. त्यात मित्रपक्षांना बरोबर ठेवण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याची कसरतही उमेदवारांना करावी लागणार आहे. या प्रचारसभा, रॅलींनंतर प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत मतदारांना आणणे अवघड काम आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का नेहमीच कमी असतो. त्यामुळे मतदारांना बाहेर काढणे. त्यांच्यापर्यंत मतदानाच्या स्लिपा पोहचवणे हे काम सोपे नाही.
प्रशासनाची धावपळ
राजकीय पक्षांच्या तयारीबरोबर प्रशासनाचाही यावेळी कस लागणार आहे. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी झालेली दमछाक, नंतर पुन्हा प्रशासनाला मोठ्या नेत्यांच्या सभांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. त्यात गडबड होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. यातच मतदानाची तयारी पूर्ण करावी लागणार आहे.