प्रवेशिका पाठविण्याचे नाट्यकर्मींना आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र सरकारच्या राज्य मराठी विकास संस्थेंतर्गत आयोजित 'रंगवैखरी' या आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. प्राथमिक फेरी १ ते १० डिसेंबर, विभागीय अंतिम फेरी २२ ते ३० डिसेंबर आणि महाअंतिम फेरी ६ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
यावर्षी राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या राज्यातील केंद्रासह बेळगाव आणि गोवा अशा एकूण दहा केंद्रांवर स्पर्धा रंगणार आहे. स्पर्धा प्राथमिक फेरी (जी तालीम स्वरूपात असेल), विभागीय अंतिम फेरी आणि महाअंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमध्ये पार पडेल. यंदा स्पर्धेचा विषय 'नव्या वाटा' असा असून, त्यामध्ये संस्थेने मराठी साहित्यात मानदंड म्हणून नावाजले गेलेले निवडक सतरा कवी व कादंबरीकार निवडले आहेत. स्पर्धकांना त्यापैकी कोणत्याही एका कवीच्या कवितेवर अथवा काव्य संग्रहावर किंवा कादंबरीकाराच्या कादंबरीवर अथवा कादंबरीतील एखाद्या घटनेवर ३५ ते ४५ मिनिटांचा नाट्याविष्कार सादर करायचा आहे. या नाट्याविष्कारात अभिनय, संगीत, नृत्य, चित्रकला आणि शिल्पकला या पाच कलांपैकी किमान तीन कलांचा समावेश असणे बंधनकारक आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धा आणि विषय यासंदर्भात स्पर्धकांसाठी संस्थेमार्फत लवकरच मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जाणार असून, त्यासाठी स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशिका भरणे गरजेचे आहे.
येथे साधा संपर्क
'रंगवैखरी' या स्पर्धेचे ऑनलाईन प्रवेशिका वेबाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला कोणतेही प्रवेशशुल्क नाही. स्पर्धेची अधिक माहिती आणि ऑनलाइन प्रवेशिकांसाठी https://sites.google.com/site/rmvsrangavaikhari या वेबसाइटला भेट द्यावी. तसेच स्पर्धेच्या अपडेट आणि ऑनलाइन मदतीसाठी https://www.facebook.com/marathikalabimb या फेसबुक पेजला लाईक करावे. स्पर्धेला रोख स्वरूपात साधारण १० लाखांची पारितोषिके दिली जाणार असून अधिकाधिक महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेने केले आहे. नाशिक केंद्रावरील स्पर्धेबाबत माहितीसाठी लक्ष्मण कोकणे ९३२६५६६०२३, राहुल गायकवाड ९६५७९८६६६१ यांच्याशी संपर्क साधावा.
लोगो : कल्चर वार्ता