अ‍ॅपशहर

गोदा जन्मोत्सवाचा आज दुर्मीळ योग

पौराणिक संदर्भांनुसार त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी या उगमस्थानापासून प्रकटलेल्या गोदावरी नदीचा जन्मोत्सव आज, शुक्रवारी (दि.११) माघ शुक्ल दशमी या तिथीवर साजरा होत आहे.

Authored byजितेंद्र तरटे | महाराष्ट्र टाइम्स 11 Feb 2022, 12:08 pm
नाशिक : पौराणिक संदर्भांनुसार त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी या उगमस्थानापासून प्रकटलेल्या गोदावरी नदीचा जन्मोत्सव आज, शुक्रवारी (दि.११) माघ शुक्ल दशमी या तिथीवर साजरा होत आहे. गोदा प्रकट होण्याच्या वेळी अवकाशात जी विशिष्ट खगोलीय स्थिती होती, ती स्थिती दरवर्षी त्याच तिथीला येईलच असे नाही. खगोलशास्त्राच्या संदर्भांनुसार हा योग किमान बारा, पंचवीस किंवा तब्बल ५० वर्षांनंतर येतो. आज नाशिक आणि ब्रह्मगिरीवर साजरा होणाऱ्या गोदा जन्मोत्सवाच्या दिवशी किमान १२ वर्षांनंतर हा योग पुन्हा साधला जातो आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rare yoga of goda janmotsav today
गोदा जन्मोत्सवाचा आज दुर्मीळ योग


पौराणिक संदर्भांनुसार गोदावरीचे वयोमान सुमारे सव्वादोन लाख वर्षे मानले गेले आहे. दरम्यान, माघ महिन्याला हिंदू धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. 'अघ' या संस्कृत शब्दाचा मराठीतील अर्थ पाप होतो. अशा पापाचा लोप करणारा तो 'माघ' महिना असे महत्त्व या मासाचे मानले गेले आहे. त्यामुळे पापक्षालनासाठी माघ महिन्यात पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत गोदास्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे.

स्मार्तचूडामणी वेदमूर्ती शांतारामशास्त्री भानोसे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, ते म्हणाले, 'गोदावरीचे भूतलावरील अवतरण हे लोककल्याणार्थ हेतूने झाल्याचे पौराणिक संदर्भ आहेत. गोदा उगमाच्या वेळी अवकाशात वृषभेचा चंद्र आणि रोहिणी नक्षत्र स्थित होते. दरवर्षी गोदा जन्मोत्सव साजरा होतो. परंतु, ही ग्रहस्थिती दरवर्षी स्थिर नसते. सुमारे बारा, पंचवीस किंवा ५० वर्षांनंतर हा विलक्षण योग साधला जातो. आज (दि. ११) हा योग साधला जातो आहे. गोदा जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून म्हणजे गुरुवारपासून वृषभेतला चंद्र आणि रोहिणी नक्षत्र स्थिर आहे. आज सूर्याने पाहिलेला दिवस म्हणून नाशिक आणि ब्रह्मगिरी येथे गोदा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. अनेक वर्षांनी हा दुर्मीळ योग साधला गेला आहे.'

...

गोदावरीचे पावित्र्य जपा

ब्रह्मगिरी पर्वताहून प्रकटलेली गोदावरी ही मुंबईकडे उलट दिशेने न वाहता नाशिकमार्गे मराठवाड्यातून आंध्र प्रदेश व पाच राज्यांमधून प्रवाहित झाली आहे. महर्षी गौतमांसारख्या द्रष्ट्या ऋषीवरांनी गोदेच्या प्रवाहातून ही भूमी सुजलाम् सुफलाम् करण्यावर भर दिला होता. हा ठेवा जपताना आपणही आपली जबाबदारी ओळखून गोदेचे पावित्र्य जपण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे आवाहनही आज गोदा जन्माच्या औचित्यावर गोदाप्रेमींनी केले आहे.
लेखकाबद्दल
जितेंद्र तरटे
जितेंद्र तरटे हे महाराष्ट्र टाइम्स, नाशिक आवृत्तीत ११ वर्षांपासून कार्यरत आहेत.पत्रकारितेत त्यांचा १६ वर्षांचा अनुभव आहे. धर्म-अध्यात्म, कृषी-पर्यटन, प्रशासन-पंचायत राज व्यवस्था, पुरातत्त्व-संस्कृती या विषयावर ते लेखन करतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज