बाजार समिती बंद असल्याने पर्यायी व्यवस्था
..
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
करोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सापडल्याने बाजार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. या बंदच्या काळात भाजीपाल्या खरेदी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी पर्यायी जागा निवडून तेथे शेतकऱ्यांना भाजीपाला आणण्यास सांगितले होते. बुधवारी (दि. २७) ज्या भागात भाजीपाला खरेदी करून पॅकिंग करण्यात येते होते, त्या जागा गुरुवारी (दि. २८) बदलण्यात आल्या.
बाजार समिती बंद असल्यामुळे नाशिकवरून राज्यातील इतर भागात आणि गुजरातमध्ये रवाना होणारा भाजीपाला एकदमच ठप्प झाला. त्यामुळे या काळात भाजीपाल्याची वाढणारी मागणी लक्षात घेऊन काही व्यापाऱ्यांनी थेट शहराच्या इतर भागात भाजीपाला खरेदी करण्याची शक्कल लढवली. बुधवारी (दि. २७) तपोवनातील साधुग्रामच्या औरंगाबाद रोडच्यालगतच्या भागात भाजीपाला खरेदी करून पॅकिंग करून वाहनांतून रवाना करण्यात आला. या भागात शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांची गर्दी दिसत होती. गुरुवारी (दि. २८) येथे एकही वाहन नजरेस पडले नाही. औरंगाबाद रोडवर निलगिरी बाग, नांदूर शिवारालगतचा भाग येथे काही शेतकऱ्यांच्या वाहनातून थेट व्यापाऱ्यांच्या वाहनात शेतमाल भरण्याचे काम सुरू होते. मात्र, कालच्या तुलनेत या संख्येत घट झालेली दिसली.
उन्हाळ्यात भाजीपाला लवकर पिकतो. अशात बाजार तीन दिवस बंद असल्यामुळे भाजीपाला कुठे विकायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला होता. जास्त पिकलेला, मोठ्या आकाराच्या भाजीपाल्याला बाजारात कुणी विकत घेत नसल्यामुळे असा भाजीपाला फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली. त्यामुळे तीन दिवसांच्या बंदमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे.
...
कोणतीही आपत्ती आली, तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत असतो. करोनामुळे बाजार समितीत बंद ठेवल्याने शेतमाल शेतात पडून राहिला. तो बाजारात आणण्याच्या लायक राहिला नसल्याने ते नुकसान शेतकऱ्यांनाच सहन करावे लागणार आहे.
- सदाशिव रहाणे, शेतकरी