म. टा. वृत्तसेवा, निफाड
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर आता कांदा साठ्यावरील निर्बंधही रद्द केल्याची अधिसूचना प्रसिद्ध केल्याची माहिती लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि. ३ डिसेंबर, २०१९च्या आदेशांनुसार देशभरातील घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन व किरकोळ व्यापाऱ्यांना ५ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा लागू केली होती. व्यापारी वर्गावर बंधन आल्यामुळे दैनंदिन कांदा खरेदीवर त्याचा परिणाम झाला होता. लाल कांद्याच्या भावात गेल्या दोन महिन्यांत घसरण होत होती. त्यामुळे कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी जोर धरू लागली होती. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवून १५ मार्चपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. निर्यात करताना व्यापाऱ्यांना कांदा खरेदी करून तो काही दिवस साठवून ठेवावा लागतो. नंतर त्याची पॅकिंग करून तो निर्यातीसाठी पाठवला जातो. निर्यातबंदी उठवताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने व्यापाऱ्यांवरील ५ मेट्रिक टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध तसेच ठेवले होते. निर्यात सुरू होण्यासाठी तीन दिवस राहिले असताना ते निर्बंधही हटविण्यात आले आहेत. यामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.