पाणीकपातीने नागरिकांचे हाल; पालिकेकडून ६६० दशलक्ष लिटरची बचत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक/नाशिकरोड
गंगापूर धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठल्यामुळे महापालिकेने मागील रविवारपासून पाणीकपात सुरू केली आहे. या कपातीमुळे पाच दिवसांत ६६० दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाली आहे. महापालिकेने गुरुवारी संपूर्ण दिवस 'ड्राय डे' ठेवत एकाच दिवशी ४६० दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली आहे. दुसरीकडे शहरात सात वर्षांनंतर प्रथमच संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहिल्याने सिडको, सातपूर भागासह झोपडपट्टीतील रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. पाणीकपातीबद्दल अनेकांना माहितीच नसल्याने आयत्यावेळी हंडाभर पाण्यासाठी अनेकांना धावाधाव करावी लागली.
पावसाने ओढ दिल्यास भविष्यात टंचाई भासू नये म्हणून महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात दोन वेळ पाणी पुरवठा होतो, तेथे एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यातून दररोज ५० ते ६० दशलक्ष लिटर्स पाणी वाचविले जात आहे. गेल्या चार दिवसांत यामुळे जवळपास २०० दशलक्ष लिटर्स पाण्याची बचत झाली आहे. महापालिकेच्या आरक्षित ४९०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी आता केवळ ७०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक राहिले आहे. गंगापूर धरणात महापालिकेचे केवळ ३८७ दशलक्ष घनफुट पाणी शिल्लक राहिले आहे, तर दारणात १४८ व मुकणेत १७४ दशलक्ष घनफूट आरक्षण शिल्लक राहिले आहे.
साठवणुकीची अडचण
एक दिवसाच्या पाणीकपातीच्या निर्णयामुळे फ्लॅटमधील रहिवासी, मजूर, झोपडपट्टीधारक अशा सर्वांना ज्यांना पाणी साठवणुकीचे साधन नाही त्यांचे हाल झाले. सन २०१२ मध्ये पाणीटंचाईमुळे महापालिकेने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यानंतर सात वर्षांनी आता एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे जाहीर करून अंमलबजावणी सुरू केली आहे. गंगापूर आणि कश्यपी धरणात अल्प पाणीसाठा आहे. पाणीकपातीमुळे नाशिककरांपुढे समस्या उभी राहिली आहे, ती पाणी साठवणुकीची. अनेकांनी पिंप, टाक्या, खरेदीस सुरवात केली आहे, तर काहींनी माळ्यावरील हांडे, टाक्या काढल्या आहेत. अनेक कार्यालये, सोसायट्यांनी पाण्याच्या टाक्या साफ करून घेतल्या आहेत.