म. टा. वृत्तसेवा, घोटी
इगतपुरी तालुका साहित्य मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित २१ व्या ग्रामीण साहित्य समेंलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि कवी विवेक उगलमुगले यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.
कवी विवेक उगलमुगले यांचे दिवाण्या आणि तोड्या, सायकलवरच्या कविता, प्रिय आईबाबांच्या शोधात, आठवणींची फुले, सांगवेसे वाटते म्हणून, आतला आवाज हे काव्यसंग्रह, शोध माणूसपणाचा हे व्यक्तिचित्रण यांसह दाट सायीचे गाव, हॅपी होम, रोजनिशी एका चिमुरडीची हे बालसाहित्य प्रकाशित आहे. अनेक पुस्तकांना त्यांची प्रस्तावना असून अनेक पुस्तकांवर समीक्षा लिहिली आहे.
बैठकी प्रसंगी मंडळाचे विश्वस्त ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, रवींद्र पाटील, दत्तात्रेय झनकर, अॅड. ज्ञानेश्वर गुळवे, अॅड. रतनकुमार इचम, हिरामण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हे २१ वे ग्रामीण साहित्य संमेलन रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पावणेसहा या वेळेत वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी) येथे तीन सत्रांत होणार आहे. सर्व साहित्यिक व साहित्यप्रेमींनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.