सलाम कॉलम
--
मनोबलासाठी संदेश ठरताये महत्त्वाचे
सध्याच्या संचारबंदीच्या काळात प्रशासनाबरोबरच सामान्यांसमोरही अनेक आव्हाने उभी आहेत. एकीकडे करोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासन, वैद्यकीय आदी व्यवस्था जोमाने काम करीत आहेत तर; दुसरीकडे गेल्या महिनाभरापासून घरातच बसून राहिल्याने अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागत आहे. या नैराश्यातून अनेकांनी स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून घेतल्याचे प्रकारही वारंवार समोर येत आहे. त्यामुळे या काळात मनोबल वाढवणे, मनःशांती जपणे सर्वाधिक महत्त्वाचे असून, यासाठी अनेकांकडून प्रयत्नही केले जात आहेत. संत, साध्वी यांच्याकडूनही पुढाकार घेण्यात येत आहेत.
कोणत्याही कठीण प्रसंगांवर विजय मिळवण्यासाठी सुदृढ मन असणे अत्यंत गरजेचे आहे. हल्लीच्या परिस्थितीत सर्व भौतिक सुविधा, सोई आजूबाजूला असल्या तरी मनःशांती नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. यामुळे नको ते मार्ग उचलले जातात. सध्या करोनाच्या परिस्थितीत लॉकडाऊन घोषित केल्याने सर्व व्यवस्था बंद आहेत. तसेच घराबाहेर पडणेही शक्य नाही. त्यामुळे नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. याबरोबरच, या नैराश्यामुळे जीवाचे बरे वाईट करून घेण्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहणे या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. एरवीदेखील मनःशांतीसाठी धार्मिक, आध्यात्मिक सक्रियता, योग, ध्यानधारणा यांकडे कल असतो. या काळातही या मार्गाने मनाला सकारात्मकता देण्याचे कार्य करण्याची गरज ओळखून जैन समाजातील साध्वी मधूस्मिताजी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. हल्ली प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन असल्याने या तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी, मनःशांती टिकून रहावी यासाठी रोज व्हिडीओंच्या माध्यमातून त्या संदेश देत असतात. करोनाच्या काळात नाशिकसह मुंबई, पाचगणी आदी ठिकाणांहून त्यांच्याकडे अनेकांनी आपले विचार व्यक्त केले होते. यामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी त्यांनी व्हिडीओंचे माध्यम निवडले. प्रार्थना, स्तोत्र, ध्यानधारणा, भजनं यातून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी बळ त्या देत आहेत.
मिळालेल्या वेळेचा आपल्या कुटूंबासोबत उपयोग करणे, आनंदात राहणे, निसर्गाचा आदर करण्याची शिकवण त्या देत आहेत. केवळ नाशिकच नव्हे तर देशभरात हे संदेश व्हिडीओच्या माध्यमातून ऐकले जात असून, त्याचे अनुकरण केले जात आहेत. या परिस्थितीत हताश न होता, हिमतीने, धाडसाने सामोरे जाण्याचा संदेश जैन धर्मियांबरोबरच इतरांसाठीही उपयुक्त ठरत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळखली जाते. सध्याच्या या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी संतांचे मार्गदर्शन मिळत असल्याने सामान्यजनांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
--
(संकलन - अश्विनी कावळे)
--