भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
...
म. टा. प्रतिनिधी , नाशिक
वर्तमानस्थितीत संकुचिततेचे मोठे आव्हान समग्र समाजाच्या पुढ्यात आहे. व्यापक आणि उदार मनोभूमिकेकडे जाण्यास सध्या समाजमन तयार नाही. या वास्तवाला सकारात्मकतेने सामोरे जाण्यासाठी हिंदुत्वाने अनुसरलेला समरसतेचा मंत्रच उद्धारक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले.
नाशिक जिल्ह्याचे माजी संघचालक कै. बाळासाहेब अहिरे यांच्या 'बिल्वदल' या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
जोशी पुढे म्हणाले की, 'समरसता हे आचरणात आणण्याचे तत्त्व आहे. समाजातील संकुचित मानसिकतेला भेदण्याचे कार्य महापुरुषांप्रमाणेच संघही नऊ दशकांपासून अविरत करीत आला आहे. सत्य सिद्ध करण्यासाठी बहुमताची आवश्यकता नसते, या तत्त्वावर श्रध्दा असल्याने सत्याधिष्ठीत हिंदू धर्माने कधीही धर्मांतरणासारख्या गोष्टींवर भर दिलेला नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आणि काळाशी सुसंगत असाच विचार हिंदुत्वाचे प्राचीन कालखंडापासून मांडला आहे', असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, बन्सी जोशी, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे अध्यक्ष कैलास साळुंखे उपस्थित होते. प्रचार विभागाचे प्रांत प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. रवी बेडेकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. नीलिमा पवार, बन्सी जोशी, मेघा बोरसे, शीतल खोत आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
...
आहेरांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी
स्वर्गीय बाळासाहेब आहेर यांच्या समर्पित संघजीवनाबाबत जोशी यांनी गौरवोद्गार काढले. समर्पण, निष्ठा, आत्मयिता, मित्रत्व, सक्रियता आदी सद्गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व खच्चून भरलेले असल्याने प्रेरणादायी होते, असे ते म्हणाले.