अ‍ॅपशहर

समृध्दीचा मार्ग धोत्रेत मोकळा

समृध्दी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या धोत्रे गावातील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यास सहमती दर्शविली असून नुकतेच येथील जमिनींची मोजणी करण्यात आली.

प्रविण बिडवे | Maharashtra Times 8 Jun 2017, 4:00 am
नाशिक ः समृध्दी महामार्गाला कडाडून विरोध करणाऱ्या धोत्रे गावातील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमिनी देण्यास सहमती दर्शविली असून नुकतेच येथील जमिनींची मोजणी करण्यात आली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील १०० टक्के मोजणी पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. समृध्दीचे महत्त्व शेतकऱ्यांच्या लक्षात येत असून, नाशिक जिल्ह्यातील विरोधही लवकरच शमेल आणि शेतकऱ्यांचा नकार होकारात बदलेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होऊ लागला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम samruddhi oppose ends
समृध्दीचा मार्ग धोत्रेत मोकळा


नाशिकमधील इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यांतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारला समृध्दी महामार्गासाठी हव्या आहेत. परंतु, वडिलोपार्जित जमिनी सहजासहजी सरकारला देण्यास शेतकरी तयार नाहीत. याउलट विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. सिन्नर तालुक्यातील शिवडे, पाथरे, डुबेरे यांसारख्या काही गावांमधील शेतकऱ्यांनी अजूनही विरोधाचे निशाण फडकावत ठेवले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अजूनही १०० टक्के मोजणी पूर्ण होऊ शकलेली नाही. अशीच परिस्थ‌िती काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात होती. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील शेतकऱ्यांकडून समृध्दी महामार्गाला प्रखर विरोध होता. तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे, घारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, कोकमठाण, संवत्सर, कान्हेगाव, भोजडे या नऊ गावांमध्ये मोजणी पूर्ण झाली. परंतु, धोत्रे गावातून तीव्र विरोध असल्याने नगर जिल्ह्यातील पुढील कार्यवाहीला ब्रेक लागला होता. आमच्या जमिनी सोडून अन्य कोठूनही या महामार्गासाठी जमिनी संपादीत करा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रशासनाने अलाइनमेंट बदलण्याचे प्रयत्न केले. परंतु, ते व्यवहार्य ठरत नसल्याचे ग्रामस्थांना पटवून देण्यात प्रशासनाला यश आले आहे. प्रदीप चव्हाण या शेतकऱ्यासारखे जे लोक महामार्गाला तीव्र व‌िरोध करीत होते, ते आता प्रशासनाला मदत करू लागल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. हा विरोध मावळला असून, राज्यातील अन्य काही भागांतदेखील समृध्दीचे महत्व शेतकऱ्यांना पटू लागल्याचा दावा प्रशासनातील अधिकारी करीत आहेत.

४९ हेक्टर जमीन होणार संपादीत

धोत्रे गावातून ४.८८ किलोमीटरचा महामार्ग जातो. त्यासाठी सुमारे ४९ हेक्टर जमिनीची गरज आहे. शेतकऱ्यांची मनधरणी करून ही जमीन संपादीत करावी लागणार होती. सात-बारा नोंदींनुसार २९७ शेतकऱ्यांची जमीन या महामार्गामध्ये जात असून, शेतकऱ्यांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी, शिर्डीचे प्रांताधिकारी, कोपरगावचे तहसीलदार, समृध्दी महामार्गाचे कामकाज पाहणारे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी धोत्रे ग्रामस्थांना समृध्दी महामार्गासाठी राजी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
लेखकाबद्दल
प्रविण बिडवे
प्रवीण बिडवे हे महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत १० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा १८ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य, गुन्हेगारी, महसूल विषयक बातमीदारीसह राजकीय, सामाजिक आणि चालू घडोमोडींवर ते लेखन करतात.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज