म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याची या वर्षीदेखील महाराष्ट्र संघातर्फे रणजी ट्रॉफी स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या स्पर्धेचा यंदाचा हा ८६ वा हंगाम आहे.
गेल्या वर्षी संपूर्ण हंगामात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर, तसेच या वर्षी विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. सत्यजितने विजय हजारे ट्रॉफीच्या एकदिवसीय सहा सामन्यांत १४, तर सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ११ सामन्यांत १५ बळी घेतले. खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीनेदेखील संघाच्या धावसंख्येत आपला वाटा उचलत आहे. आयपीएल लिलावामध्ये सत्यजितवर बोली लागली नाही. त्यामुळे गेल्या वर्षी सत्यजितची संधी हुकली. मात्र, यंदा सत्यजितच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची निश्चितच आयपीएलचे एखाद्या संघामध्ये निवड होण्याची शक्यता आहे.
हरयाणाविरुद्ध पहिल्या फेरीच्या चार दिवसीय रणजी सामन्याने ९ डिसेंबरपासून हरयाणातील लाहली येथे या हंगामातील महाराष्ट्राची पहिली लढत होत आहे.
महाराष्ट्राचा संघ :
नौशाद शेख (कर्णधार), अंकित बावणे, ऋतुराज गायकवाड, स्वप्निल गुगळे, चिराग खुराणा, विशांत मोरे (यष्टिरक्षक), राहुल त्रिपाठी, अजीम काजी, सत्यजित बच्छाव, जगदीश झोपे, प्रदीप दाढे, मुकेश चौधरी, अनुपम संकलेचा, समद फल्लाह, दिग्विजय देशमुख.