…म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका व माजी अध्यक्षा शांताबाई बाबुलाल छाजेड (वय ९२) यांचे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शांताबाईंनी संथाराव्रत स्वीकारले होते.
अनेक वर्षे सामाजिक कामात योगदान दिले होते. तसेच अनेक वर्षे जैन धर्मशाळेत धार्मिक संस्कार देण्याचे काम केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शिवणकाम करून चरितार्थ चालवला होता. बंधू किसनलाल बोरा यांच्या प्रेरणेने त्या काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या. नाशिक येथे १९४६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात त्यांच्याकडे भोजन व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आली. त्यातून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्याशी त्यांची जवळीक निर्माण झाली. १९४२ साली झालेल्या रॉकेल आंदोलनात त्यांनी मोलाची कामगिरी केली. १९७२ साली त्यांनी नाशिक जिल्हा महिला लघुउद्योग सहकारी संस्थेची स्थापना करून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.
नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्षपद, महिला अर्थिक विकास महामंडळ, एसटी महामंडाळावर अनेक वर्षे संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी अजन्म खादीचा स्वीकार केला. प. पु. गौतम मुनी यांच्या आशीर्वादाने त्यांनी बुधवारी संथाराव्रत स्वीकारले. सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा बंधू बाबुलाल बोरा यांच्या दत्तनगर, पेठरोड, पंचवटी येथील निवासस्थानापासून निघणार आहे.
नम्रपणे नाकारली होती उमेदवारी
शांताबाई यांनी नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेत अनेक पदे भूषविली होती. स्व. वसंतराव नाईक व व्यंकटराव हिरे यांच्या त्या मानस भगिनी होत्या. काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याने यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब वर्तक यासारख्या नेत्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. १९७२ साली त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले होते. परंतु, त्यांनी ते सन्मानपूर्वक नाकारले होते.