म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बीवायकेच्या स्नेहसंमेलनाला यंदा सामाजिकतेचे कोंदण लावत, 'धान्य संकलन' उपक्रम राबवत राबविण्यात आला. 'कॉलेज डेज'च्या उत्साहात सामाजिक बांधिलकी म्हणून संकलित करण्यात आलेल्या सुमारे ७०० किलो धान्याचे बुधवारी वाटप करण्यात आले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थी विकास समितीतर्फे स्नेहसंमेलनात सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांकडून गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी हे धान्य संकलित करण्यात आले. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत झालेल्या स्नेहसंमेलनात हा उपक्रम राबविणय्ता आला. उपक्रमातून २५० किलो तांदूळ, २५० किलो गहू संकलित झाले. तसेच १५० किलो ज्वारी व बाजरी आणि ५० किलो डाळींचे संकलन झाले. सुमारे ७०० किलो धान्याचे बुधवारी शाळा व बालाश्रमात वाटप करण्यात आले. कृषिनगर परिसरातील महापालिकेच्या शाळेत २०० किलो, तर त्र्यंबकेश्वर येथील खंबाळे गावातील बालाश्रमात २५० किलो धान्य देण्यात आले. आज अशोकस्तंभ येथील अनाथाश्रमात २५० किलो धान्य देण्यात येणार आहे. स्नेहसंमेलनाच्या उत्साहासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दातृत्व रुजावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. बी. बी. गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी कमलेश काळे, अनिरुद्ध लोंढे, मृणाल पाटील, तेजस कुमावत, मयूर आहेर यांसह इतर विद्यार्थ्यांनी उपक्रमाचे संयोजन केले.