म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शेतकरी विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेचा यांचा खास शैलित सत्कार करण्यास गेलेल्या सुकाणू समितीचे कार्यकर्त्यांना सत्काराआधीच पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घोषणा करुन आपला संताप व्यक्त केला. दानवे शनिवारी विविध विकासकामांसह, लग्नसोहळ्यासाठी नाशिकला येणार असल्यामुळे या आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते.
ताब्यात घेतल्यानंतर सुकाणू समितीच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना साला व शेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे तर पायावरती गोळ्या मारा, असे वक्तव्ये केल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आमच्या शैलीत खास सत्कार करणार होतो असे सांगितले. पण, पोलिसांनी या आंदोलनाच्या अगोदरच ताब्यात घेतल्याचे सांगून सरकारच्या दादागिरीवरही त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना साला म्हणणारे दानवे शेतकऱ्यांचे दाजी असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे सुकाणू समितीचे नियोजन होते. त्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून दानवे यांचे औंक्षण करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठी काळी
शाल, काळा पोशाख त्यांना आणला होता. पण, विश्रामगृहात पोहचताच शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात सुकाणू समितीचे कार्यकर्ते करण गायकर, गणेश कदम, राजू देसले, नाना बच्छाव, प्रकाश चव्हाण, नितीन सातपुते, नवनाथ शिंदे, दीपक पोटिंदे, किरण बोरसे, अर्जुन शिरसाठ, उत्तम कापसे, सुभाष गायकर, महेंद्र चौरे, गणेश बडवार, आनंद पवार, अमोल देवरे, किरण लवंड, देवानंद गिरी, प्रथमेश पिंगळे, संतोष खिळे, अक्षय गोरे यांसह शेतकरी उपस्थित होते.
कडेकोट बंदोबस्त
सुकाणू समिती आंदोलन करणार असल्यामुळे शासकीय विश्रामगृहात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांवरही पोलिसांची नजर होती. दिवसभर या ठिकाणी पोलिसांचा ताफा उभाच होता.