म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अतिक्रमण निर्मूलन कारवाईच्या वारंवार नोटिसा देऊन महापालिका सातपूर-अंबड लिंकरोड येथील नागरिक, व्यापारी, मजुरांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. सूडबुद्धीने कारवाई करून नागरिकांवर उपासमारीची वेळ आणत आहे. हा प्रकार थांबवून व्यावसायिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी नाशिक ट्रेडर्स असोसिएशनतर्फे शहरात शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तोंडावर पट्ट्या बांधून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
सातपूर-अंबड लिंकरोडवर अतिक्रमण निर्मूलनाचा बडगा उगारण्याचा इशारा महापालिकेने दिल्यामूळे या व्यावसायिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सतत कारवाईची टांगती तलवार डोक्यावर ठेवून येथील व्यावसायिकांना वावरावे लागते आहे. महापालिकेद्वारे नोटिसा पाठवून कारवाईचा इशारा दिला जात असल्याने हे व्यावसायिक दहशतीखाली आहेत. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या निकालानुसार या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. बहुतांश व्यावसायिकांनी महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन येथे शेड ठोकले. अतिक्रमणे केली नसतानाही आता पुन्हा अतिक्रमणांच्या नावाखाली महापालिकेकडून दडपशाहीचे धोरण अवलंबिले जाऊ लागल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच या व्यावसायिकांनी नाशिक ट्रेडर्स असोसिएशनच्या माध्यमातून मोर्चाचे आवाहन केले होते. त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदानाजवळ मोठ्या संख्येने व्यावसायिक एकत्रित जमले. तेथून या मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्र्यंबक नाका सिग्नल, जिल्हा परिषद, खडकाळी सिग्नल, शालिमारमार्गे हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला. या मार्गांवर तोंडावर पट्ट्या बांधून निघालेले मोर्चेकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. आंबेडकर पुतळा येथे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून महापालिकेच्या दडपशाहीच्या धोरणाचा निषेध नोंदविला. महापालिकेने कारवाई थांबविली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
--
वाहतुकीचा उडाला फज्जा
या आंदोलनामुळे सिव्हिल हॉस्पिटल ते खडकाळी सिग्नल या मार्गावर वाहतुकीचा फज्जा उडाला होता. त्र्यंबक नाका सिग्नल, जनरल पोस्ट ऑफिस चौक, खडकाळी सिग्नल या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. मोर्चात शेकडोंच्या संख्येने सहभागी झालेले सातपूर-अंबड लिंकरोड येथील व्यापारी व अन्य घटकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
--
अन्य भागात कारवाई का नाही?
केवळ आमच्याच भागात एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली ही कारवाई वारंवार करण्यात येत आहे. शहरात अन्य भागात कारवाई का केली जात नाही, असा सवाल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात करण्यात आला आहे. अनेक लोकांनी अतिक्रमणे करून तेथे पक्की बांधकामे केली आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून केवळ सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांवर कारवाई का केली जाते, असा सवाल या असोसिएशनने उपस्थित केला आहे.