म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट फॉरवर्ड करताना काळजी घ्या. आक्षेपार्ह असल्यास तत्काळ पोलिसांच्या निर्दशनास आणून द्यावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.
बकरी ईद व आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक शनिवारी (दि.१०) पोलिस मुख्यालयातील भीष्मराज सभागृहात पार पडली. बैठकीस पोलिस उपायुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौगुले, विजय खरात, सर्व धर्मीयांचे नागरिक उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रास्ताविक व ईदच्या निमित्ताने प्रशासनाच्या तयारीबाबत माहिती दिली.
शहर-ए-खतीब तसेच पद्माकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. बकरी ईदचा सण शांततेत व उत्साहात साजरा होईल, याबाबत त्यांनी खात्री दिली. आयुक्तांच्या सूचनेवरून आयुक्तांसह सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी आपापले मोबाईल क्रमांक उपस्थित नागरिकांना दिले.