अ‍ॅपशहर

टाकळीचा ठराव केरात

टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मंदिरालगत बांधण्यात आलेले सभागृह ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा ठराव महापालिकेने केला होता. या ठरावाला अनेक वर्षे लोटली तरी हे सभागृह अद्याप ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आलेली नाही.

Maharashtra Times 24 Aug 2017, 4:00 am
महासभेत विषय मंजुरीनंतरही मंदिराचे सभागृह अद्याप ट्रस्टकडे नाहीच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम takli samarth ramdas swami temple issue at nashik
टाकळीचा ठराव केरात



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मंदिरालगत बांधण्यात आलेले सभागृह ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा ठराव महापालिकेने केला होता. या ठरावाला अनेक वर्षे लोटली तरी हे सभागृह अद्याप ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. त्यामुळे टाकळी येथे येणाऱ्या भाविकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच, धार्मिक ठिकाण असतानाही या सभागृहात उपद्रवी आणि व्यसनींचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

नंदिनी नदीला येत असलेल्या पुरामुळे समर्थ रामदास स्वामी मंदिराला धोका निर्माण झाला होता. नदीच्या पाण्यामुळे मंदिरासमोरील मातीचा भाग ढासळत जाऊन मंदिरापासून २० फूट असलेली जमीन फक्त चार फूट राहिल्याने मंदिराला धोका निर्माण झाला. याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे खर्चाचे काम असल्यामुळे येथील ट्रस्टींनी तत्कालीन महापौर शांताराम बापू वावरे यांना महापालिकेत जाऊन परिस्थिती समजावून सांगितली. यावेळी त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्यक्ष पाहणी केली. मनपाच्या महासभेत बंडोपंत जोशी यांनी केलेल्या मागणीनुसार महापौर उत्तमराव ढिकले यांनी संरक्षक भिंत बांधण्यासाठी १० लाख रुपये मंजूर केले. यानंतर महापौर अशोक दिवे यांनी ५४ लाख रुपये बांधकामासाठी मंजूर केले. या सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौर दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत या सभागृहाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. दोन सभागृहांपैकी एका सभागृहाला मातोश्री राणुबाई सभागृह व दुसऱ्या सभागृहाला दादासाहेब पोतनीस सभागृह अशी नावे देण्याचेही जाहीर केले.

दोन्ही सभागृहे श्री समर्थ सेवा मंडळास धार्मिक सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्यासाठी ताब्यात देण्याचे जाहीर केले. मंडळाकडे बांधकाम सुपूर्द करण्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार झाली. परंतु, मंडळाचा वाद कोर्टात सुरू आहे, अशा काही लोकांनी वावड्या उठवल्याने या कामाला खो बसला. परंतु, या आधीच मंडळाच्या बाजूने कोर्टाचा निकाल लागला होता. २०१२ रोजी हायकोर्ट मुंबई यांनी नवीन आदेशानुसार नवीन घटना करून विश्वस्ताची नेमणूक करण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायाधीश हे कायमस्वरूपी अध्यक्ष असून, सात जणांचे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज