जून अर्धा संपला तरी पावसाची प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी नाशिककरांना अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रहिवाशांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्ह्यातील आणखी १९ गावे आणि ७५ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने १८ टँकर्सला मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासियांची तहान भागविण्यासाठी धावणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ झाली असून शंभरीकडे वाटचाल सुरू आहे.
जिल्हावासीयांनी यंदा तप्त उन्हाच्या झळांचा सामना केला. उन्हाच्या दाहकता आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचे उपलब्ध स्त्रोतही आटू लागले आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे टँकर्सची मागणी होऊ लागली. ७७ टँकरद्वारे २६८ गावे आणि वाड्यांना पाणीपुरवठा सुरू होता. आणखी ९२ गावे आणि वाड्यांसाठी १८ टँकर्सला प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या टँकर्सची संख्या ९५ होणार आहे.
बागलाण, येवल्यात सर्वाधिक झळा
येवला, बागलाण आणि सिन्नर तालुक्यात टंचाईच्या सर्वाधिक झळा सहन कराव्या लागत आहेत. या तीन तालुक्यांमध्ये ५२ टँकर सुरू असून आणखी दोन टँकरला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मालेगाव व नांदगावमध्ये देखील प्रत्येकी नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. १०३ गावे आणि १६५ वाड्यांसाठी ७७ टँकर्सद्वारे दररोजच्या २५७ फेऱ्या होत आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या गावांसाठी दोन दिवसांत १८ टँकर धावण्यास सुरूवात होणार आहे. याखेरीज पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५६ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.
..
नव्याने मंजूर केलेले टँकर
चांदवड तालुक्यातील एका गावासाठी, सिन्नर तालुक्यातील १० वाड्या आणि दोन गावे, सुरगाणा तालुक्यातील १३ गावे व २९ वाड्या, नांदगावमधील तीन गावे व ३४ वाड्यांसाठी टँकरला मान्यता देण्यात आली आहे. तसेच देवळा, त्र्यंबकेश्वर आणि मालेगाव तालुक्यातही ९ वाड्यांसाठी नव्याने टँकर सुरू करण्यात आले आहेत.