म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुदाम नागरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १० ड मधील जागेसाठी पोटनिवडणूक न झाल्याने स्थायीमधील भाजपचे बहुमत धोक्यात आले आहे. भाजपचा मित्रपक्ष परंतु, पालिकेत विरोधात असलेल्या शिवसेनेने आता पालिकेतील १२२ ऐवजी १२१ संख्याबळानुसार सदस्यांची गुणोत्तर फेरनिश्चिती करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.
महापालिकेची आर्थिक तिजोरी असलेल्या स्थायी समितीवरील भाजपचे नियंत्रण संपुष्टात येणार असून, शिवसेनेचे संख्याबळ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेतील संख्याबळ ६६ असून, दुसऱ्या क्रमांकावर सेनेचे ३५ संख्याबळ आहे. यानुसार स्थायी समितीवर भाजपचे ९, तर सेनेचे ४ सदस्य आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. परंतु, प्रभाग क्र.१० ड मधील भाजपचे नगरसेवक सुदाम नागरे यांचे आजारपणामुळे जुलैमध्ये निधन झाले होते. यामुळे नगरसेवकपदाची एक जागा रिक्त असून नियमानुसार आतापर्यंत या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. पालिकेने प्रस्ताव पाठवूनही निवडणूक आयोगाने अद्याप पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही. त्यामुळे स्थायी समितीत भाजपचे बहुमतच संकटात आले आहे. सध्या १२१ संख्याबळानुसार शिल्लक गुणोत्तर प्रमाण हे ०.५९ आहे, तर शिवसेनेचे प्रमाण हे ०.६२ एवढे आहे. त्यामुळे ०.०३ चे गुणांकन शिवसेनेचे जास्त असल्याने भाजपचा स्थायीवर एक सदस्य कमी होऊन शिवसेनेचा एक सदस्य वाढणार आहे. त्यामुळे या पाचव्या जागेवर आता शिवसेनेने दावा ठोकला असून, नवीन गुणोत्तर प्रमाण निश्चित करण्यासाठी थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी विभागीय आयुक्तांना पत्र लिहून महापालिका आयुक्तांना आदेशित करण्याची मागणी केली आहे. महापालिका अधिनियम ३१ (अ) नुसार गुणोत्तर फेरनिश्चिती करण्याचे आदेश नगरसचिवांना द्यावेत, अशी मागणी केली आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी भाजपशी समन्वयाची भूमिका मांडताना कायदेशीरित्या जर शिवसेनेची जागा वाढत असेल, तर त्यांनी द्यावी अशी मागणी केली. राज्यस्तरावरील नुकत्याच झालेल्या युतिधर्माचा संदर्भ देत भाजपने एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन केले आहे. परंतु, भाजपने न्याय दिला नाही तर, मात्र उच्च न्यायालयात जाणार असल्याचे बोरस्ते यांनी स्पष्ट केले आहे.
इतर समित्यांचेही गणित बदलणार
विभागीय आयुक्तांनी नवीन गुणोत्तर प्रमाणानुसार संख्याबळ निश्चित केले, तर भाजपचे सर्वच समित्यांमधीन बहुमत जाणार आहे. स्थायीप्रमाणेच महिला व बालकल्याण समिती, शिक्षण समिती, शहर सुधार, आरोग्य व वैद्यकीय समित्यांमधील भाजपचे बहुमत जाणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीतील ही जागा राखण्याचे भाजपसमोर आव्हान आहे. शिवसेनेने भाजपला साथ दिली नाही, तर थेट चिठ्ठीद्वारे या समित्यांच्या सभापतींची निवड होणार असल्याने भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.