हिंदी, संस्कृत विषयक मार्गदर्शनात तज्ज्ञांचा सूर
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विद्यार्थ्याला आकलन झालेल्या ज्ञानाचे व्यवस्थितरित्या उपयोजन करता यावे, हा कृतिपत्रिका मूल्यमापन पद्धतीमागील प्राधान्याचा हेतू आहे. ज्ञान, आकलन, स्मरण आणि उपयोजन या पायऱ्यांद्वारे विद्यार्थी पुढे जातो. या पायऱ्या चढण्यासाठी पाठ्यपुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास हिंदी किंवा संस्कृत भाषेसारख्या विषयात गरजेचा आहे, असा सूर रेषा एज्युकेशन सेंटर आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या वतीने आयोजित उपक्रमात व्यक्त झाला. सेंटरच्या गंगापूर रोड येथील केंद्रात रविवारी 'हिंदी' आणि 'संस्कृत' या दोन्ही विषयांवर स्वतंत्र मार्गदर्शन सत्र पार पडले.
पहिल्या सत्रात कुमूदिनी फेगडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की पूर्वीच्या परीक्षा पद्धतीत पाठांतरावर भर होता. पण कृतिपात्रिका पद्धतीत आकलन व उपयोजनावर भर आहे. विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त असेल, धडा-कविता नीट समजली तर कृतिपात्रिका सोडवणे सोपे जाईल. उतारा दिलेला असल्याने उत्तरे उताऱ्यातच असतात. ती पाहून लिहिता येतात. त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका कमी होऊन विद्यार्थ्यांचे गुण वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही सत्रांसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शुद्धलेखनाकडे लक्ष द्या
परीक्षेला अद्याप १ महिना १० दिवस शिल्लक आहेत. पाठांतराचे श्लोक रोज एकदा पुस्तकात पाहून म्हटले तरी आपोआप पाठ होतील. पाठांतरचे गुण सहज मिळतील. रोज एक धडा वाचत राहा. धडे त्यामुळे परिचयाचे होतील. परीक्षेत उताऱ्यात उत्तरे पटकन सापडतील. व्याकरणाचे प्रश्न लिहिताना शुद्धलेखनाकडे विशेष लक्ष द्या, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
घोकंपट्टीला गुडबाय
हिंदी विषयाच्या कृतिपत्रिकेसाठी मार्गदर्शन करताना सुरेखा बोंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की कृतिपत्रिकेमुळे घोकंपट्टी करण्याच्या पद्धतीला गुडबाय करता येणार आहे. त्या ऐवजी नवीन पद्धती ही ज्ञान, आकलन, उपयोजनेची कसोटी बघणारी आहे. गद्य, पद्य, अपठीत, व्याकरण व रचना विभाग अशा विभागांमध्ये कृतिपत्रिकेची विभागणी आहे. सर्वच विभागांना समान महत्त्व द्यायला हवे. या बदलत्या अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष असल्याने अधिकाधिक प्रश्न हे धड्याखालील येण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकातील धडे नीट अभ्यासायला हवे. उतारा दिलेला असणार पण हा उतारा वाचून उत्तरे शोधण्यासाठी वाचन चांगले हवे. परीक्षेपर्यंत रोज एक धडा वाचला तरी दोन-तीनदा वाचन होईल. त्यामुळे धडे सुपरिचत होतील व उताऱ्यात उत्तरे पटापट शोधता येतील.
आकलनाचे उपयोजन नीट करा
व्याकरणाचा प्रश्न सोडवताना शुद्धलेखनाकडे कटाक्षाने लक्ष द्या. लेखन कौशल्यात पत्रलेखन, आकलन, वार्तालेखन, विज्ञापन, कहानी, निबंध हे प्रकार आहेत. पत्रलेखनाचा बदललेला पॅटर्न नीट लक्षात घ्या. शीर्षकावरून कथा, शब्दावरून कथा लिहिताना शीर्षकाचा अर्थ नीट लक्षात घ्या. तुम्हाला आकलन झालेल्या ज्ञानाचे उपयोजन नीट करता यावे, हाच या कृतिपत्रिका परीक्षा पद्धतीचा हेतू आहे, असे मार्गदर्शन बोंडे यांनी केले.