एचएएलचे महाप्रबंधक अनिल घारड यांची अपेक्षा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असली तरी तिच्याविषयीची आस्था आणि प्रेम वाढायला हवे, अशी अपेक्षा एचएएलचे महाप्रबंधक अनिल घारड यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केली.
भारत सरकारच्या नगर राजभाषा कार्यान्वय समिती निलांबर कोलकाताच्या वतीने 'एक साँझ कविता कहानी की' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोडवरील केबीटी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी घारड बोलत होते. व्यासपीठावर एलआयसीचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक तुलसीदास गडपायले, एसबीआयचे उपमहाप्रबंधक सुधीर भागवत, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, नीलांबर कोलकाता संस्थेचे अध्यक्ष डॉ. विमलेश त्रिपाठी, उपाध्यक्ष यतीश कुमार, कथालेखिका वंदना राग, कवी दासू वैद्य, हिंदीतील नामवंत कवी आशुतोष दुबे, रश्मि भारद्वाज आदी मान्यवर उपस्थित होते.
घारड म्हणाले, कुठल्यातरी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कार्यक्रमांमुळे राष्ट्रभाषेतील नियोजित कार्यक्रम अन्यत्र हलवावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांची संख्या देखील समाजात राष्ट्रभाषेबद्दल किती आस्था आहे, हे दाखवून देते. ही आस्था वाढावी असे वाटत असेल तर त्यासाठी प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर भरतनाट्यमद्वारे सरस्वती वंदना सादर करण्यात आली. आस्था मांदळे आणि शिवानी जोशी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या संगीतबद्ध कविता सादर केल्या. या सुश्राव्य रचनांना रसिकांनी दाद दिली. त्यानंतर कोलकाता येथील साहित्यक व सांस्कृतिक संस्था नीलांबरच्या संकल्पनेतून कवितांवर आधारित विविध मोंताज, कोलाज तसेच माईम प्रकार देखील सादर करण्यात आले. यावेळी साहित्य आणि संस्कृतीचा मिलाप असलेल्या कार्यक्रमात साहित्यिकारांच्या रचनेवर दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण करण्यात आले.