म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनसह संचारबंदी लागू झाल्यापासून विक्रीअभावी शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ कर्जबाजारी झाल्याची ओरड हजारो शेतकरी एकीकडे करीत असताना दुसरीकडे या संकटात जराही न डगमगता जिद्द आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर भाडेतत्त्वावरील शेतात पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारात पोहोचवण्याची किमया युवा शेतकऱ्याने साधली आहे.
सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर शेवगेदारणा (ता. नाशिक) येथील कैलास कचरू कासार या युवा शेतकऱ्याने यशस्वी मात केली असून, विषमुक्त खा आणि निरोगी राहा, या उद्देशाने या धडपड्या शेतकऱ्याने फॅमिली फ्रेश फार्म या ब्रँडखाली पिकविलेल्या रसायनविरहित भाजीपाल्याला नाशिकसह आता पुणे शहरातूनदेखील मागणी येऊ लागली आहे.
करोनाच्या आगमनानंतर शेती व्यवसायच डबघाईस आला. हजारो शेतकऱ्यांवर आर्थिक नुकसानीची कुऱ्हाड कोसळली. या अस्मानी संकटामुळे हजारो शेतकरी मेटाकुटीस आलेले असताना शेवगेदारणा या गावातील कैलास कासार या शेतकऱ्याने मात्र हार न पत्करता भाडेतत्त्वावर शेती घेऊन विषमुक्त शेतीचा प्रयोग केला. स्वत:च्या शेतात गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय द्राक्ष उत्पादनाचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. परंतु, त्यात त्यांना अपेक्षित यश न मिळाल्याने बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झालेले वडील कचरू कासार यांच्या सहकार्याने कैलास कासार यांनी भाजीपाल्याची सेंद्रिय शेती करण्याची वाट निवडली. इतर सधन शेतकऱ्यांकडून कैलास कासार यांचा सेंद्रिय भाजीपाला पिकविण्याचा प्रयोग प्रारंभी थट्टेचा विषयदेखील बनवला गेला. परंतु, भारत ज्ञान विज्ञान समुदाय या संस्थेच्या शेती विज्ञान मंडळाच्या मार्गदर्शनामुळे या युवा शेतकऱ्याच्या प्रयोगशीलतेला आणखी बळ मिळाले. अवघ्या दहावी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलेल्या कैलास कासार यांनी एनआरसी येथे प्रशिक्षण घेतले. बारामती अॅग्रोतूनदेखील प्रेरणा मिळाली. भाडेतत्त्वावर शेती घेऊन त्यात भेंडी, वाल, चवळी, भरताची वांगी, वांगी, टोमॅटो,भोपळा, मिरची, दोडकी, गिलकी, कारले, गवार, श्रावण घेवडा अशा प्रकारचा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने पिकवून कासार यांनी करोनाच्या संकटावर मात केली आहे. सध्या नाशिकमधून त्यांच्या भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून मागणी येत असून, ते थेट ग्राहकांना आपल्या शेतातील भाजीपाला पोहोच करीत आहेत.
जीवामृतनिर्मिती शेतातच
सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक जीवामृताची निर्मिती शेतातच केली जाते. सर्वप्रकारचे तणदेखील खतनिर्मितीसाठी वापरले जाते. कीटक सापळे, सोलर ट्रॅप उभारून कीटकांचे नियंत्रण केले जाते. पीएसबी, केएसबी या मित्र जीवाणूनिर्मिती केली जाते. या पिकात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा वावर वाढला असल्याचे कचरू कासार यांनी सांगितले.
--
विषमुक्त शेतीचा प्रयोग करोनाच्या संकटात तारणहार ठरला आहे. पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्याकडील भाजीपाल्याच्या देशी वाणांचा वापर केला असून, कोणत्याही प्रकराची रासायनिक औषधे आणि खते न वापरता भाजीपाला पिकविला आहे. या भाजीपाल्यास ग्राहकांकडून चांगली मागणी मिळत आहे. काही वर्षांपूर्वी जेलरोडला रस्त्यावर भाजीपाला विक्री करताना मला रस्त्यावरून उठवून दिले होते. आता ग्राहकच माझ्याकडे येत आहेत.
-कैलास कासार, शेवगेदारणा