म. टा. वृत्तसेवा सटाणा
गत वर्षभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने कांद्यावरील अनुदान देण्याची ग्वाही देवून देखील आजपर्यंत तालुक्यातील १८ हजार ९९० कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ९ कोटी १६ लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान रखडले आहे. हे अनुदान तातडीने देण्यात यावे अशा मागणी निवेदन भारतीय जनता पक्षाचे नाशिक जिल्हाउपाध्यक्ष अरविंद बिंदू शर्मा यांनी सहकार मंत्र्यांना दिले आहे.
सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांना दिलेल्या निवेदनात बिंदूशेठ शर्मा यांनी म्हटले आहे, शासनाच्या धोरणानुसार १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारात पहिल्या टप्प्यातील कांद्याची विक्री केली आहे. त्या शेतकऱ्यांना ५ कोटी ८५ लाख रुपये अदा करण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील वाढीव मुदतीत १६ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याचे प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही.
बागलाण तालुक्यातील सटाणा बाजार समितीतील ८ हजार ८९४ व नामपूर बाजार समितीमधील १० हजार ९६ कांदा उत्पादक शेतकरी मिळून बागलाण मधील तब्बल १८९९० शेतकऱ्यांनी ९ कोटी ५८ लाख क्किंटल कांदा विक्री केलेला असून त्यांचे प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे सुमारे १९ कोटी १६ लाखांचे अनुदान रखडले आहे. बागलाणमधील दुष्काळग्रस्त व टंचाईने हैराण झालेल्या शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झालेला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. यामुळे आर्थिक विवंचेनतून शेतकरी वर्गाला बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने कांदा अनुदान शेतकरी वर्गाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी शर्मा यांनी केली आहे.