निरंकारी सत्संग सोहळा आजपासून
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
संत निरंकारी मिशनतर्फे शहरात आयोजित भव्य सत्संग सोहळ्यास आजपासून (दि. २४) सुरुवात होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येस शहरात सुमारे दीड लाखांवर भाविक राज्य-परराज्य आणि देशविदेशातून उपस्थित झाले आहेत. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी पेठ रोडवरील हॉटेल राऊ येथून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. यंदाचा हा ५३ सत्संग असून तो पहिल्यांदाच मुंबईबाहेर नाशिकमध्ये होत आहे.
बोरगड परिसरातील सत्संग स्थळावर यात्रेचा समारोप होईल. यानंतर दुपारच्या सत्रात मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षाजी महाराज या भाविकांशी प्रवचनातून संवाद साधतील. सत्संगाच्या या मुख्य सोहळ्यास दुपारी अडीचला सुरुवात होणार आहे. 'मानवतेच्या नावे संदेश' असा प्रवचनाचा विषय आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत सत्संग सुरू राहील. दरम्यान, सत्संग स्थळावर लाखो भाविकांच्या सुविधेसाठी वीज, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था आदी गरजेच्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.
'संत निरंकारी मिशनची ९० वर्षे' या विषयाला यंदाचा सत्संग समर्पित आहे. सेवा दल रॅली शनिवारी (दि. २५) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत काढली जाणार आहे. यात मिशनच्या सेवादलाचे हजारो महिला व पुरुष सदस्य गणवेशात या रॅलीत सहभाग घेतील. यानंतर माताजींच्या मुख्य प्रवचनाचा सोहळा सुरू होईल. सत्संग रविवारी (दि. २६) दुपारी २.३० ते रात्री ९ या वेळेत होईल. सत्संगाची विधिवत सांगता झाल्यानंतर सोमवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता सत्संग स्थळी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ६० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा होणार आहे.