म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
करोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व प्रवासी रेल्वे गाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या विविध भागांत जीवनावश्यक व अन्य वस्तूंची टंचाई होऊ नये म्हणून फक्त मालगाड्या सुरू राहणार आहेत. रेल्वे तिकिटांचे आरक्षणाचे पैसे २१ जूनपर्यंत परत मिळणार असल्याने प्रवाशांनी रेल्वेस्थानकांमध्ये येऊ नये, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
कोट्यवधींचा तोटा
रेल्वेच्या इतिहासात प्रथमच रेल्वेगाड्या इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. ब्रिटिशांच्या काळात सुरू झालेली नाशिकरोड रेल्वेही प्रथमच ठप्प झाली आहे. भारतीय रेल्वेला रोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ३१ मार्चपर्यंत धावणार नाहीत. तसेच पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसारख्या इंटरसिटी ट्रेन (दोन शहरांना जोडणाऱ्या) गाड्याही रद्द राहतील. नाशिकरोड स्थानकातून दररोज ८३ रेल्वेगाड्या धावतात. दररोज आठ हजार तिकिटे विकली जाऊन तेरा ते पंधरा लाखांचा महसूल मिळतो. याशिवाय रिझर्व्हेशन, प्लॅटफार्म तिकिटे, रेल्वे पार्किंग, स्थानकातील आणि स्थानकाबाहेरील खाद्यपदार्थ विक्रेते, रिक्षाचालक, बस अशी सर्व मिळून लाखो रुपयांची उलाढाल होते. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे रोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.
तिकिटांचे सर्व पैसे परत
रेल्वे प्रशासनाने आरक्षण तिकीट, रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर २१ जूनपर्यंत त्याचे संपूर्ण पैसे परत देण्याचे जाहीर केले आहे. रेल्वे तिकीट खिडकीवरुन घेतलेले आरक्षण तिकीट हे ऑनलाइनही रद्द करता येऊ शकते. प्रवाशांनी तिकीट व आरक्षण करण्यासाठी रेल्वेस्थानकात गर्दी करू नये, ऑनलाइन पद्धतीनेच तिकीट रद्द करावे असे आवाहन रेल्वेने केले आहे. ई-रेल्वे तिकीट ऑनलाइन रद्द करून त्याचे पैसे आपोआप प्रवाशाच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी असलेली तीन दिवसांची मुदत वाढवून ती २१ जूनपर्यंत करण्यात आली आहे. टीडीआरचा कालावधीही तीन दिवसांवरून तीस दिवस करण्यात आला आहे. प्रवाशांना संपूर्ण रिफंड मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही.
चोवीस तास गस्त
रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकात चोवीस तास गस्त सुरू ठेवली आहे. आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डी. पी. झगडे, एस. सी. शर्मा, देसले व सहकारी तीन शिफ्टमध्ये गस्त घालत आहेत. रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक जाधव, रवींद्र पाटील व त्यांचे सहकारी रेल्वेशी संबंधित चोरी व अन्य गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्टेशन मास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कुंदन महापात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अधिकारी, कर्मचारी हे देखील प्रवाशांना मदत व मार्गदर्शन करत आहेत.
५२ गाड्या रद्द
रविवारी मध्य रेल्वेने प्रमुख ५२ रेल्वेगाड्या रद्द केल्या. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी, गोदावरी या चाकरमान्यांच्या रेल्वेगाड्याही रद्द होत्या. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची निराशा झाली. अन्य रद्द केलेल्या गाड्या - अप मनमाड- इगतपुरी पॅसेंजर, अप-डाऊन भुसावळ - देवळाली पॅसेंजर, एलटीटी-अलाहाबाद तुलसी एक्स्प्रेस, डाऊन मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, डाऊन मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, एलटीटी- गोरखपूर काशी एक्स्प्रेस, कामाख्या एक्स्प्रेस, डाऊन मुंबई लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस, गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, मुंबई हावडा एक्स्प्रेस, दरभंगा पवन एक्स्प्रेस, वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, मुंबई- जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर व्हाया मनमाड नंदिग्राम एक्स्प्रेस, मुंबई हावडा दुरांतो एक्स्प्रेस, मुंबई फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, भुसावळ नागपूर वाया इटारसी इंटरसिटी एक्स्प्रेस.