म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
आज हजारो संस्था व व्यक्ती वृक्षारोपण करीत असतात, मात्र केवळ संवर्धन होत नसल्याने वेळोवेळी रोपण करण्यात आलेली झाडे जगत नसल्याचे भीषण वास्तव आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिसाने एक झाड संवर्धन करण्यावर भर देण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत गोडसे यांनी केले.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी गोडसे बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, भगीरथ हांडोरे, कृष्णा चव्हाण, विशाल साळुंके, आबा शेवाळे, मनोहर बागूल, चंद्रभान पाटील, संतोष मुळे, मनोहर साळुंके, अनुपशा शाहू, स्वाती कांडेकर आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनात पोलिसांचाही हातभार लागावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे वांजळे यांनी सांगितले.