म. टा. प्रतिनिधी, नाशिक
'कार्यक्षमता वृध्दीसाठी संवाद कौशल्यांमध्ये गुणात्मक वाढ होणे गरजेचे असते. यादृष्टीने संवादाचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने प्रयत्न करावे,' असे प्रतिपादन ओरिजिन फांऊडेशनचे संचालक डॉ. संदीप माने यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित 'संवाद : आयुष्य जगण्याची कला' या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. संदीप माने म्हणाले, 'संवाद ही अप्रतिम कला आहे. दैनंदिन जीवन जगताना तिचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. यासाठी संवाद कौशल्याचे शालेय जीवनापासून शिक्षण विद्यार्थ्यांना गरजेचे आहे. कोणत्याही समस्येचे निराकरण होण्यासाठी त्यावर व्यापक प्रमाणात चर्चा होणे गरजेचे असते. यामध्ये आपली जीवनशैली, वृत्ती, वेशभूषा व भाषा हे महत्त्वाचे घटक असून, सामुहीक पध्दतीने काम केल्यास मिळणार आनंद वेगळाच असतो.' यावेळी त्यांनी आरोग्य विद्यापीठाच्या सहकार्याने आरोग्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संवाद कौशल्याचे प्रशिक्षण उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले,'संवाद प्रभावी होण्यासाठी चर्चात्मक कार्यक्रमात भाग घेणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे राज्यातील विविध महाविद्यालयात संवाद कौशल्य विषयावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्याचा कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, जेणेकरुन डॉक्टर व रुग्ण संवाद सुधारण्यात याची अधिक मदत होईल. संवाद कौशल्य वाढविण्यासाठी सर्वांनी विविध व्याख्यान, चर्चात्मक कार्यक्रम याच्यात सहभाग घेतल्यास संवाद प्रभावी झाल्याचे जाणवेल.'
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. समन्वयन संजय नेरकर यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.