म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरात प्रथमच डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि चिकुनगुनिया या आजारांनी एकत्र थैमान घातले असून, शहरातील बहुतांशी हॉस्पिटल्स गर्दीने ओसांडून वाहत आहेत. छोट्याच नव्हे तर मोठ्या हॉस्पिटल्समध्येदेखील या आजारांचे पेशंट दाखल करून घेण्यासाठी जागा अपुरी पडते आहे. नागरिकांनी हे आजार टाळण्यासाठी जागरूक असणे आवश्यक असून, त्याद्वारेच त्यांना आळा घालणे शक्य होणार आहे.
शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यू या आजारामुळे १५ ते २० जणांचा बळी गेला असून, या आजाराच्या संशयित पेशंटमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच परतीचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून, यामुळे ऑक्टोबर हिट ओसरून हवेत गारवा निर्माण झाला आहे. दुर्दैवाने साचलेले पाणी आणि थंड हवामान स्वाइन फ्लू तसेच डेंग्यूचा पसार करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आजमितीस शहरातील अनेक हॉस्पिटलमध्ये या पेशंटच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसते. उपनगरांमधील लहान दवाखान्यांपासून शहरातील मोठे हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स यांच्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दाखल होत आहेत. काही हॉस्पिटलमध्ये तर बेड शिल्लक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच प्रशासनाने बेड शिल्लक नसल्याचे बोर्डही लावले आहेत. काही हॉस्पिटलच्या ओपीडी बाहेर तर पेशंटला बसायलाही जागा नसल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत बोलताना रक्तविकार, कॅन्सर व अस्थिमगज प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. प्रीतेश जुनागडे यांनी सांगितले की, डेंग्यू या आजारात पेशंटच्या प्लेट्सलेटसचे प्रमाण ५० हजारांच्या खाली येते. साधारणत: हे प्रमाण दीड ते साडेचार लाख असणे आवश्यक असते. बऱ्याचदा डेंग्यूची लागण झाली की दोन दिवस ताप येतो. यानंतर ताप उतरतो, मात्र शरिराची प्रतिकार क्षमता कमी होते. ताप येऊन गेल्यानंतर अगदी सहाव्या ते आठव्या प्लेटलेट्स कमी होतात. यामुळे अशा पेशंटने सातव्या दिवशी प्लेट्सलेट्सचे प्रमाण तपासून घ्यायलाच हवे. दुर्दैवाने असे झाले नाही तर पेशंटच्या प्लेट्सलेट्स अगदीच १० हजारापर्यंत पोहचतात. यामुळे शरीरातर्गंत रक्तस्त्राव होतो किंवा अगदी लिव्हरदेखील निकामी होते. डेंग्यूची लागण झालेल्या १० टक्के पेशंट या अवस्थेपर्यंत पोहचतात. सध्या डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून, ऑक्टोबर हिट वाढल्यानंतर या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे डॉ. जुनागडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एम. डी. मेडिसिन असलेल्या डॉ. वैभव पाटील यांनीदेखील या आजारांच्या पेशंटमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे स्पष्ट केले. आजमितीस शहरातील बहुतांश हॉस्पिटल्समध्ये या तीन साथरोगांच्या पेशंटना दाखल करून घेण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले. दरवर्षी या तीनपैकी एक साथ जोरात असते. यंदा या तीनही आजारांनी डोकेवर काढल्याने ही परिस्थिती उद्भवली. डेंग्यूसाठी डास कारणीभूत असून, स्वाइन फ्लूचा फैलाव वातावरणावर तसेच व्यक्तीच्या सवयींवर अवलंबून असतो, असे पाटील म्हणाले. हस्तांदोलन, गर्दीत जाणे टाळल्यास तसेच फ्लूची साधारण लक्षणे दिसून आल्यास त्याची काळजी घेतल्यास स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवणे शक्य होते, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.