आमदार निर्मला गावितांचे स्पष्टीकरण
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला. पाच वर्षांत सत्तेत नसल्याने केवळ दहा टक्के निधी विकासकामांसाठी मिळविता आला. त्यामुळे पक्षांतकर करून यापुढे मतदारसंघाचा विकास हेच ध्येय असेल, असा विश्वास आमदार निर्मला गावित यांनी व्यक्त केला.
इगतपुरी-त्र्यंबक विधानसभेच्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी त्यांनी कार्यकर्त्यांसह त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे गावापासून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्र्यंबक नगर परिषद गटनेत्या नगरसेविका मंगला आराधी, नगरसेविका कल्पना लहांगे, शहराध्यक्ष सचिन दीक्षित, भूषण अडसरे यांनी शिवनेरी चौकात त्यांचे स्वागत केले. विश्वस्त संतोष कदम, माजी नगराध्यक्ष तथा मंदिराचे पुजारी धनंजय तुंगार यांनी आमदार गावित यांना प्रसाद देऊन सन्मान केला.
गावित पुढे म्हणाल्या, त्र्यंबक तालुक्यात काही मध्यम स्वरुपाचे प्रकल्प बांधणी करायची आहे. किकवी धरणाबाबत शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशा प्रकारे काम पुढे नेणार आहे. गोपाळ लहांगे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करीत तसे प्रसिद्धी फलका लावून आपली बदनामी केली आहे. त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेत आपण कोणत्याही दबावाने प्रवेश केला नाही तर केवळ विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिंकून तर दाखवा...
घोटी : गेल्या दहा वर्षांत इगतपुरी मतदार संघात आमदार निर्मला गावित यांनी स्वार्थी राजकारण केले. या स्वार्थी राजकारणामुळे मतदार संघाचा विकास झाला नाही. केवळ समाजासमाजात दरी निर्माण करून त्यांनी आपली राजकिय पोळी भाजली. आगामी विधानसभा मतदार काँग्रेस, मित्रपक्ष त्यांना त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे निर्मला गावित यांनी निवडणूक जिंकून दाखवावी, असे आव्हान जि. प. चे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांनी दिले. इगतपुरी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सुनील आव्हाड, भास्कर गुंजाळ, जनार्धन माळी, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.