राज्य परिषदेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे मत
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारतात कॅन्सरचे पेशंट हे अन्य देशांपेक्षा वेगळे ठरतात. भारतात पेशंटची संख्या मोठी असून, अमेरिकेत तंबाखू अथवा गुटख्याचे सेवन होत नाही. भारतात कॅन्सरचे निदान चौथ्या टप्प्यात होत असल्याने पेशंट दगावण्याची संख्या मोठी ठरते. अमेरिकन पद्धतीने भारतात कॅन्सरवर उपचार करणे किती योग्य आणि त्यात काय बदल करणे अपेक्षित आहे, यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी चर्चा केली.
शहरात झालेल्या दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय अँमो परिषदेच्या समारोप प्रसंगी डॉ. चंद्रशेखर पेठे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावेळी डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. पूर्वेश पारीख, डॉ. गोविंद बाबू, 'अँमो'चे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डोक्याचा आणि मानेचा कर्करोग तसेच गर्भाशय आणि अंडाशयाच्या कर्करोगावर चर्चा, परिसंवाद झाले. डोक्याचा आणि मानेचा कर्करोग हा मुख्यत्वे गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट, मद्यसेवन केल्याने होतो. भारतात ग्रामीण भागात मिस्री वापरणाऱ्या स्रियांमध्येही मोठ्या प्रमाणात हा कर्करोग आढळतो आहे. दुर्दैवाने या आजाराचे निदान उशिरा होण्याचे प्रमाण भारतात जास्त आहे. अमेरिकेत ९५ टक्के कॅन्सर पहिल्या टप्प्यातच निदान होऊन उपचार सुरू केले जातात. याउलट भारताची स्थिती असून, दोष मात्र तंत्रज्ञानाला दिला जातो, असेही मत तज्ज्ञांनी मांडले. दरम्यान, नाशिकमध्ये प्रथमच राज्यस्तरावरील कॅन्सर संबंधित तज्ज्ञांची परिषद झाली आहे.
कर्करोग उपचार व निदान करण्याचे नवे तंत्रज्ञान आता उपलब्ध असून स्त्रियांसाठी गर्भाशय आणि अंडाशायाच्या कर्करोगासाठी स्क्रिनिंग, लसीकरण सुविधा उपलब्ध आहेत. याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पर्यटन करण्याबाबत परिषदेत उहापोह करण्यात आला. नाशिकच्या आदिवासी भागात विविध तपासणी शिबिरे घेण्याचा निर्णयही झाला आहे.
- डॉ. शैलेश बोंदार्डे,
कॅन्सर तज्ज्ञ व परिषदेचे आयोजक