अ‍ॅपशहर

फोफावणाऱ्या रोपांचा पुरातन मंदिरांना धोका

पंचवटीतील मंदिरांवर पुन्हा वड, पिंपळ, उंबर यांसारख्या वृक्षांची रोपे वाढू लागली आहेत. या रोपांचा समूळ नाश केला नाही, तर मंदिरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 19 Sep 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम trees on old temples
फोफावणाऱ्या रोपांचा पुरातन मंदिरांना धोका


त्र्यंबकेश्वरला उगम पावणारी गोदावरी नाशिक शहरातून दक्षिणेला वळसा घेते ते ठिकाण पवित्र मानले गेले आहे. या वळणाच्या ठिकाणी रामकुंडासारखे तीर्थक्षेत्र आहे. शिवाय येथे अनेक पुरातन मंदिरेही आहेत. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही मंदिरे या भागातील वैभव आहे. मात्र, या मंदिरांवर पुन्हा वड, पिंपळ, उंबर यांसारख्या वृक्षांची रोपे वाढू लागली आहेत. या रोपांचा समूळ नाश केला नाही, तर मंदिरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

नाशिकला २०१५-१६ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी रामकुंडावरील मंदिरांचे सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी या मंदिरांची आतून व बाहेरून स्वच्छता करण्यात आली होती. त्यावेळी मंदिरावर वाढलेली वृक्षांची रोपे काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे मंदिरांना झळाळी प्राप्त झाली होती. मात्र, दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा वड, पिंपळ आणि उंबर यांसारख्या वृक्षांच्या रोपांची या मंदिरांवर वाढ होत असल्याचे दिसू लागले आहे. ही रोपे आताच नष्ट केली नाहीत, तर मंदिरांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेक पक्षी वेगवेगळ्या ऋतूत येणारी फळे खातात. या पक्ष्यांची विष्ठा पडलेल्या भागाला पाणी मिळताच त्या बिया रुजू लागतात. या रुजणाऱ्या बिया पावसाळ्यात वाढू लागतात. सध्या अशीच रोपे या भागातील मंदिरांवर फोफावल्याचे दिसून येत आहे.

--

योग्य वेळी काढावीत रोपे

पंचवटी परिसरातील मंदिरांच्या दोन दगडांच्या फटींत या रोपांची मुळे सध्या घट्ट पकड धरू लागली आहेत. उन्हाळ्यात काहीशी कोमेजलेली ही रोपे पावसाळ्यात पाणी मिळताच जोमाने वाढली आहेत. मात्र, ही रोपे याच अवस्थेत नष्ट करणे गरजेचे असल्याने ती काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज