म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वटपौर्णिमा कधी साजरी करावी याबाबत गृहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, १६ व १७ जून रोजी वटपौर्णिमा असल्याने नक्की कोणत्या वारी उपवास धरावा याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. मात्र रविवारी दीड वाजेपर्यंत वटपूजन करावे, अशी माहिती दाते पंचांगात देण्यात आली आहे.
यंदा ज्येष्ठ पौर्णिमेला आज (दि. १६) दुपारी दोन वाजता प्रारंभ होऊन सोमवारी (दि. १७) दुपारी दोन वाजता समाप्त होत आहे. तथापि वटपौर्णिमा मात्र ज्येष्ठ शु. १४ ला म्हणजे रविवारी दिली आहे. सूर्यास्तापूर्वी सहा घटीपेक्षा अधिक व्यापीनी अशा चतुर्दशीयुक्त असलेल्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीव्रत (वटपूजन) करावे असे वचन आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी २.०२ पर्यंत चतुदर्शी तिथी असली तरी त्याच दिवशी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत म्हणजे सुमारे दुपारी दीड वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटपूजन करावे. या शास्त्रवचनानुसार ज्येष्ठ शु. १४ ला रविवारी म्हणजे दि. १६ जून रोजी नेहमीप्रमाणे उपवासासह वटपूजन करावे, अशी माहिती दाते पंचांगात दिली आहे.
...
वटसावित्री व्रतासाठी पौर्णिमा १६ जून रोजी मिळत असून, १७ जून रोजी मिळत नाही. त्यामुळे वटसावित्री व्रत व वटपौर्णिमेचा उपवास इत्यादी रविवारी, १६ जून रोजीच करणे शास्त्रसंमत आहे. असे धर्मशास्त्रसंमत सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगात सांगितलेले आहे.
- अमोलशास्त्री किरपेकर, पुरोहित