म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
पर्यावरण, वृक्षलागवड आणि संवर्धनाबाबत सध्याच्या आणि भावी पिढीत आवड निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 'कन्या वन समृद्धी' योजना सुरू केली आहे. १ जुलैपासून राज्यभर या योजनेच्या अंमलबजावणीलाही प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला शासनाच्या वतीने विविध वृक्षांची दहा रोपे लागवडीसाठी विनामूल्य दिली जाणार आहेत.
राज्यात 'कन्या वन समृद्धी' योजनेच्या अंमलबजावणीस हिरवा कंदिल दिला आहे. वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त वनेत्तर क्षेत्र वनांखाली आणणे, शेतकरी दाम्पत्याला दहा रोपे विनामूल्य देऊन वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, पर्यावरण आणि वृक्ष लागवड व संवर्धनाच्या कामात आवड निर्माण करणे, मुलगा-मुलगी समान असून महिला सबलीकरणाचा सामाजिक संदेश देणे, मुलींच्या घटत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे आदि उद्देशांनी सरकारने राज्यात 'कन्या वन समृद्धी' योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत सहभागासाठी संबंधित शेतकरी कुटुंबास ग्रामपंचायतीमध्ये आपला अर्ज सादर करावा लागणार आहे. मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दि. १ ते ७ जुलै या कालावधीत मुलीच्या नावाने शेतकरी दाम्पत्यास १० रोपे लावावी लागणार असून, ही रोपे वनखात्यामार्फत ग्रामपंचायतीतच शेतकऱ्यास मोफत दिली जाणार आहेत. लावलेल्या वृक्षांची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी करावी लागणार आहे. या दहा रोपांत पाच साग, दोन आंबे, फणस, चिंच आणि जांभूळ यांचे प्रत्येकी एक रोप दिले जाणार आहे. लागवड केलेल्या रोपांचे फोटो ग्रामपंचायतीकडे सादर करावे लागणार आहेत. प्राप्त माहिती ग्रामपंचायतींकडून तालुकास्तरावरील वनक्षेत्रपालाकडे दरवर्षी ३१ जुलैपर्यंत सादर केली जाणार आहे.
उत्पन्न मुलींसाठी
लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलीच्या कौशल्य विकासासाठी वापरण्यास शेतकऱ्यांना मुभा राहणार आहे. लागवड केलेली झाडे जिवंत राहण्यासाठी व निरोगी वाढ होण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे तांत्रिक सल्ला दिला जाणार आहे. दरवर्षी ३१ मे रोजी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीस जिवंत रोपांची माहिती सादर करावी लागणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामसेवकावर राहणार आहे. ज्या शेतकरी कुटूंबात मुलगी जन्माला येईल त्या कुटुंबाचे ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अभिनंदन करून मुलीच्य जन्मनोंदीच्या वेळी 'कन्या वन समृद्धी' या योजनेची माहिती देऊन अर्जही भरून घेणार आहेत. या योजनेमुळे वृक्ष लागवडीच्या मोहिमेला हातभार लागणार आहे.