म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील कब्रस्तान आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी होत असलेल्या गर्दीमुळे करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. अंबड-लिंक रोडवरील संजीवनगर येथील करोना संशयित रुग्णाच्या अंत्यसंस्काराला कब्रस्तानात जवळपास दोनशे लोक उपस्थित असल्याने त्यातून तेरा जणांना करोनाची लागण झाली आहे. स्मशानभूमीतही अशीच एक घटना घडल्यामुळे महापालिकेने दक्षता म्हणून शहरातील प्रमुख स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून येथील सुरक्षेबरोबरच गर्दीवरही लक्ष ठेवता येणार आहे.
नवी मुंबईत मृत्यू झालेल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी २ मे रोजी गेलेल्या अंबड-लिंकरोडवरील वृद्धाचा २१ मे रोजी मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला. या घटनेमुळे ५३ जणांना कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात भरती व्हावे लागले. आतापर्यंत यातील १३ जणांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या वृद्धाच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत दोनशेहून अधिक नातेवाईक उपस्थित राहिल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे या भागात करोनाचा उद्रेक झाला आहे. सातपूर कॉलनीतील एका महिलेने तीन आठवड्यांपूर्वी मालेगावजवळील चिंचगव्हाण येथील एका अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. परतल्यानंतर संबंधित महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या महिलेमुळे जवळपासच्या १० जणांनाही करोनासंसर्ग झाला. यातूनच सातपूर कॉलनीतही करोनाचा उद्रेक झाला. मालेगाव, जळगावातही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात अंत्यसंस्कारांसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा शासनाने दिली आहे. मात्र, हे निकष पाळले जात नसल्याने करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख स्मशानभूमी, दफनभूमींच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
क्वारंटाइन करेणे सोपे
कॅमेरे बसविल्यानंतर स्मशानभूमी, दफनभूमींच्या सुरक्षेचा प्रश्न तर सुटणार आहेच, त्याचबरोबर अंत्यसंस्काराच्या वेळी होणाऱ्या गर्दीवरही नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. प्रामुख्याने करोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थितांपैकी कोणाला करोनाची लागण झाल्यास उपस्थित असलेल्या अन्य लोकांची ओळख पटविता येईल व लगेच क्वारंटाइन करता येईल. त्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज प्रशासनासाठी सहाय्यभूत ठरणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
अंत्यविधीसाठी अधिकाधिक २० लोकांची उपस्थिती असावी, असे सरकारी निर्देश आहेत. करोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला केवळ पाच लोकांना परवानगी आहे. मात्र काही ठिकाणी अधिक लोक उपस्थित राहिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका, नाशिक.