पिण्यासाठी : ३५० दशलक्ष घनफूट
सिंचनासाठी : १५०० दशलक्ष घनफूट
..
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा मुहूर्त अखेर पाटबंधारे विभागाने सोमवारी साधला. दुपारी साडेचार वाजता पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पिण्यासह सिंचनासाठी हे आवर्तन सोडण्यात आल्याने दिंडोरी, निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पाणी सोडू, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पाटबंधारे विभागाने सोमवारी (दि. १९) पाणी सोडण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष दिली होती. आश्वासन न पाळल्यास अधिवेशनात हैदोस घालू, असा इशारा भुजबळ यांनी दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सोमवारी दुपारी साडेचारपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला. सकाळी १० वाजताच हा विसर्ग सुरू करण्यात येणार होता. परंतु, विंचूरजवळ पाणीगळतीची शक्यता असल्याने कॅनॉलच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. पिण्यासाठी ३५० दशलक्ष घनफूट, तर सिंचनासाठी १५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. दुपारी साडेचारपासून साधारणत: एक हजार क्यूसेकने विसर्ग सुरू केला जाणार असून, पुढील तीन आठवडे तो सुरू राहण्याची शक्यता आहे.