अ‍ॅपशहर

नालेसफाईची चौकशी कधी?

यंदाच्या पहिल्या आणि काल परवा झालेल्या दुसऱ्या पावसांत नाशिक शहराची झालेल्या दैनाला पावसाळापूर्व कामांमधील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती.

Maharashtra Times 27 Jun 2017, 4:00 am
महापौरांच्या घोषणेला आठ दिवस उलटले; शिवसेना विचारणार जाब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम when did drainage cleaning inquiry
नालेसफाईची चौकशी कधी?


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या पहिल्या आणि काल परवा झालेल्या दुसऱ्या पावसांत नाशिक शहराची झालेल्या दैनाला पावसाळापूर्व कामांमधील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा होऊन आठ दिवस उलटले तरी चौकशीचा कागद हललेला नाही. महापौरांनी नालेसफाई कामांच्या चौकशीची रुपरेषा अद्यापही स्षष्ट न केल्याने या चौकशीबाबत संशय बळावला आहे. त्यामुळे विरोधकांना शांत करण्यासाठीच महापौरांनी घोषणा तर केली नाही ना, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

१४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची दैना झाली होती. नदीत पाणी नसतांनाही शहरातील गल्लीबोळात मात्र पुराचे लोट आले होते. या पावसामुळे नाशिककरांचे मोठे नुकसान झाले होते. महापालिकेकडून नालेसफाईचे काम झाले नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांनी केला होता. पालिकेच्या ढिलाईमुळेच ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर झाला. या पावसाने शहराचे नुकसान झाल्याचा आरोप करत गेल्या महासभेत विरोधकांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवर वादळ निर्माण झाल्यामुळे महापौरांनी सभाच गुंडाळली होती. त्यामुळे महापौरांवर प्रशासनाला पाठीशी घातल्याचा आरोप झाला होता.

महापौरांनी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांच्या आरोपाची दखल घेत, गेल्या मंगळवारी पावसाळी पूर्व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची घोषणा केली होती. त्यासाठी एक समिती स्थापन करून तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली होती. परंतु या घोषणेला आता आठ दिवस उलटले असून, अजूनही चौकशीची रुपरेषा जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घोषणेबाबत संशय बळावला आहे. सध्या प्रशासनाकडून शहरातील नदी नाल्यांचे सफाईचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला अभय देण्यासाठी या चौकशीला उशीर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेना जाब विचारणार असून, महापौरांनी घोषणेची आठवण करून देणार असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज