कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांचे प्रतिपादन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भारताची अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून आहे. शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शेतीवर आधारित उद्योगधंदे वाढीस लागणे काळाची गरज बनली आहे. ग्रामीण युवकांनी शेतीपूरक व्यवसायाच्या संधी शोधून स्वयंरोजगार उभारावा, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन यांनी केले.
मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने अलीकडेच ग्रामीण युवकांसाठी १५ दिवसांचा 'रोपवाटिका व्यवस्थापन' या विषयावर निवासी प्रशिक्षण कार्यक्रम झाले. त्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, प्रशिक्षण संयोजक हेमराज राजपूत हे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. इ. वायुनंदन म्हणाले, की ग्रामीण युवकांनी आता नोकरी मागणारे न बनता नोकरी पुरविणारे अशी नवी ओळख निर्माण करावी. कृषी विज्ञान केंद्राने या व्यवसायांचे मॉडेल्स आपल्या प्रक्षेत्रावर उभारले आहेत. तसेच या व्यवसायासंबंधी कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षणेही केंद्र राबवीत असते. या संधीचा लाभ घेऊन ग्रामीण युवकांनी शास्रीय पद्धतीने शेती करून आपली नवीन ओळख निर्माण करावी. त्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र नेहमीच तत्पर असेल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. प्रारंभी ग्रामीण युवकांनी घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग व ग्रामीण व शेती विकासासाठी करावा आवाहन केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले.
प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील १८ युवकांनी सहभाग घेतला. यात फळे, भाजीपाला व शोभीवंत फुलझाडांची रोपे, कलमे, त्यांची निगा, देखभाल व विक्रीव्यवस्था यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. नाशिक व डहाणू (कोसबाड) परिसरातील व्यावसायिक रोपवाटिकांना भेट आणि अभ्यासदौराही झाला होता. सहभागी युवकांनी या प्रशिक्षणातील ज्ञान व कौशल्याचा वापर भाजीपाला, शोभीवंत झाडे व फुलझाडांची रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास आपल्या मनोगतात व्यक्त केला. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व आवश्यक माहिती पुस्तिका केंद्रातर्फे देण्यात आली. या वेळी केंद्रातील कृषी विज्ञान केंद्राचे राजाराम पाटील, संदीप भागवत, डॉ. श्याम पाटील, अर्चना देशमुख, डॉ प्रकाश कदम, संतोष साबळे उपस्थित होते. हेमराज राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश व्यवहारे यांनी आभार मानले.