लोगो - बालकथा
चतुर माकडाची धाडसी शेपूट
वैभव गिलाणकर, नाशिक
एका जंगलावर मोठे संकट आले होते. कुठूनतरी एक वणवा पेटून पसरत पसरत पूर्ण जंगलाला भस्मसात करण्यासाठी येत होता. वणव्याची झळ सर्व प्राण्यांना लागत होती. ससे, हरणं, हत्ती, वाघ, सिंह घोळक्यांनी-कळपांनी; तर चिमण्या, पोपट, कबुतरांसारखे पक्षी थव्या थव्यांनी दूर निघून जात होते. पण काही प्राणी असे होते जे एवढ्या वेगाने दूर जाऊ शकत नव्हते, त्यात एक साप आणि एक माकडही होतं. ते दोघे एकमेकांचे मित्र होते. साप सरपटत पसरणाऱ्या आगीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता, पण भडभडणाऱ्या ज्वाळा त्याच्याजवळ पोहोचू लागल्या होत्या. माकडही झाडांवरून उड्या मारत चाललं होतं पण त्याला शेपूट नव्हती, त्यामुळे शेपटीने जशा फांद्या पकडाव्या तशा पकडता येत नसल्यामुळे त्याचा वेग मंदावला होता.
शेवटी ते दोघे तात्पुरता एका ठिकाणी आडोश्याला थांबले. साप हताश होऊन माकडाला म्हणाला, 'काही खरं दिसत नाही! मला फार वेगाने सरपटता येत नाहीये आणि तुलाही शेपटीविना झाडांवरून नीट पळता येत नाहीये. तुला शेपटी असती तर तू आपल्या दोघांना घेऊन जाऊ शकला असतास.' माकडाला हे ऐकून लगेच एक कल्पना सुचली आणि त्याने ती सापाला सांगितली. प्रथम त्याने सापाला आपल्या कमरेला घट्ट बांधलं पण त्याचं तोंड आणि काही भाग मोकळा ठेवला. आणि मग माकड झाडावर चढून चपळाईने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारू लागले, ज्या फांद्या त्याच्या हाताला लागत नव्हत्या त्यावर साप स्वतः झडप घालून वेटोळा घालायचा, थोडक्यात म्हणजे साप माकडाची शेपटीच बनला होता. अशारितीने ते दोघे वेगाने चालले होते, शेवटी उड्या मारत मारत दोघेही जंगलाच्या सीमेवरील नदी किनारच्या झाडावर आले. नदीपलीकडे पोहोचून ते दोघे सुरक्षित होणार होते पण तेथल्या फांदीवरून नदीपलीकडील झाडाच्या फांदीत जास्त अंतर होते. माकडाला ती झेप घेणे अवघड जाणार होते पण, सापाने त्याला सांगितले,'तू उडी मार, आपण नीट पोहोचू.' माकडाने एक जोरदार उडी मारली पण त्याचा हात फांदीला लागला नाही आणि तो कोसळणार इतक्यात सापाने माकडावरचा आपला वेटोळा सोडला आणि झडप घालून एक फांदीला पकडलं आणि तो ओरडला, 'लवकर माझ्या शेपटीला पकड!' माकडाने चपळाईने एखाद्या दोरीला पकडावे तसे सापाला पकडले, त्यामुळे सापाला थोडी इजाही झाली पण, त्याने माकडाला पडण्यापासून वाचवले. मग ते दोघे खाली आले. माकडाने सापाचे आभार मानले, 'मित्रा, मला वाचवल्याबद्दल धन्यवाद!'. साप त्याला म्हणाला, 'तू युक्तीने आपल्या दोघांचीही अडचण दूर करून संकटातून मार्ग काढलास, तेव्हा तुझे उपकार मी फेडायलाच हवे.' यानंतते दोघे जण सोबतीने नव्या घराच्या शोधात निघाले.