म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दसरा मेळाव्यातील भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यांना श्रीरामाची मूर्ती भेट देण्यात आली. तो धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरावरून भाजपला टोला हाणला. 'दरवर्षी देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार या रूपाने रावण उभा राहतो. पण, राम मंदिर काही उभे राहत नाही. याविषयी देशात संताप आहे. मंदिराच्या नावाने रथयात्रा निघाल्या, विटा गोळा झाल्या, पण मंदिर काही उभे राहिले नाही. पंतप्रधान उत्तर प्रदेशात जातात, पण त्यांना चार वर्षांत एकदाही अयोध्येला जाता येत नाही', असे उद्धव म्हणाले.
'बाबरी मशिद पाडल्यानंतर तुम्ही शेपट्या आत घातल्या, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच गर्व से कहो हम हिंदू है असे सांगत हिंदूना चेतवले, उभे केले. बाळासाहेबांची हीच परंपरा मी नम्रपणे पुढे घेऊन जातोय. आताही तुम्ही 'मंदिर उभारणार हा केवळ एक जुमला होता', असे निर्लज्जपणे जाहीर करा, मग आम्हीच शिवसैनिकांना सोबत तमाम हिंदूना घेऊन अयोध्येत राम मंदिर उभारतो, असे सांगत उद्धव यांनी २५ नोव्हेंबरचा अयोध्या दौरा जाहीर केला. या दौऱ्यातूनच पंतप्रधानांना प्रश्न विचारणार, असे सांगताना, 'हा दौरा केवळ आठवण करून द्यायला आहे', असेही ते म्हणाले. तुम्ही मंदिर उभारू शकत नाही याचा अर्थ तुमच्या डीएनएमध्येच प्रॉब्लेम आहे, असे सांगताना, सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवसेनेचाच विचार मान्य केल्याबाबत त्यांचे उद्धव यांनी अभिनंदन केले.
'दुष्काळ जाहीर करण्याची धमक दाखवा'
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर करण्याची धमक राज्याचे मुख्यमंत्री दाखवत नाहीत. केवळ आढावा घेण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे कर्नाटक सरकारने मागच्या आकडेवारीचा आढावा घेत दुष्काळाची मदत जाहीर केल्याकडे उद्धव यांनी लक्ष वेधले. शिर्डीला पंतप्रधान येत असून सरकार खर्च करतेय, त्यापेक्षा आमच्या गरीब शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत देऊन जा, असे सांगताना 'सरकारने दुष्काळ लवकर जाहीर केला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरणार', असा इशारा त्यांनी दिला.
'राज्याचा कारभार नीट चालत नसेल तर मी बोलणारच. माझ्या वडिलांनीच मला शिकवले आहे. मी जसा बोलतोय तसेच संघ देखील भाजपला कानपिचक्या देतोय, मी मात्र सरकारच्या कानाखाली आवाज काढतोय. सरकारवर टीका केल्यामुळे आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्याबाबत सल्ले दिले जात आहेत. मग ज्या संघाने भाजपला सत्तेवर बसवले त्यांना का नाही भाजपला बाहेर काढण्याबाबत विचारले जात, असा सवाल उद्धव यांनी केला. देशात पत्रिकेत शनी आणि मंगळ यांची वक्रदृष्टी पडली असली तरी त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे, असे सांगत उद्धव यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. सन २०१४च्या निवडणुकीत यांचा अश्वमेघ शिवसेनेनेच रोखल्याची आठवणही त्यांनी करून दिली. जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याची भाषा तुम्ही केलीत, पण आजवर काहीच झाले नाही. तुम्ही जर लोकसभेत हा प्रस्ताव आणणार असाल तर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतो, असेही उद्धव म्हणाले.
'तुमच्याकडे विष्णूचा अकरावा अवतार'
महागाई रोखणे, तेलाच्या किंमती कमी करणे आमच्या हातात नाही असे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद मग्रुरीने सांगतात. नितीन गडकरी देखील, 'आम्ही आश्वासने देतच सत्तेवर आलो, पण आता आश्वासने पूर्ण करणे आम्हाला जमत नाही', असे निर्लज्जपणे सांगतात. देशात रुपया घसरत चालला आहे. पण हे सर्व होत असताना तुमच्याकडे तर विष्णूचा अकरावा अवतार आहे. मग तुम्ही महिला अत्याचार, महागाई, बेरोजगारी हे सर्व रोखायलाच हवे. निवडणुकांच्या आधी तुम्ही हे सर्व रोखण्याची आश्वासने दिली होती. आताही पाच राज्याच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यापासून ते मंत्रिमंडळातील मंत्री अशीच सर्व आश्वासने देणार आहेत. पण ती तुम्ही पूर्ण करू शकणार नसलात तर एक दिवस या जनतेचा ज्वालामुखी फुटेल, असा इशाराही त्यांनी दिला. या पाच राज्यांतील महागाई आणि इतर सर्व प्रश्न तुम्ही सोडवण्याचे आज जाहीर करा, मी देखील तुमच्यासोबत प्रचाराला येतो, असेही उद्धव म्हणाले.
'सेनेचा आवाज रोखण्याची ताकद नाही'
माइकचा आवाज दूरवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी काही शिवसैनिकांनी केल्या. त्यावर माइकवाल्यांना, 'तुमचे जरा देशी बळ वाढवा' असे सांगत, 'शिवसेनेचा आवाज रोखण्याची ताकद कोणाच्यात नाही, आमचे शिवसैनिकच देशात हिंदुत्वाचा बुलंद नारा देतील', असे उद्धव म्हणाले.