म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्रात शुक्रवारी १३९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ५४ तर ठाण्यातील ३० रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय पुणे आणि जळगावमध्ये प्रत्येकी १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोनाबळींची एकूण संख्या दोन हजार ८४९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात दोन हजार ४३६ नवे करोनाबाधित आढळले असून, आजमितीस सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज एक हजार ४७५ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ इतकी झाली आहे. सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या पाच लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण तीन हजार ८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २ हजार ८३२ इतके आहे. राज्यात पाच लाख ४५ हजार ९४७ नागरिक घरात विलगीकरणात असून, सध्या ३० हजार २९१ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत, असे टोपे यांनी सांगितले.
राज्यात शुक्रवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ठाणे-९३ (मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण डोंबिवली ७, भिवंडी १) नाशिक-२४ (जळगाव १४, नाशिक ३, मालेगाव ८), पुणे-१६ (पुणे १४, सोलापूर २), कोल्हापूर- ५ (रत्नागिरी ५), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), औरंगाबाद-१ असे आहेत. यात ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत.