म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
लोकसभा निवडणुकीसाठी अवघा सहा-सात महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे युती-आघाडी यांच्यात नेमके काय करायचे यावरून जोरदार खल सुरू असतानाच आपण हवेचा अंदाज घेऊन कोणाला साथ द्यायची याचा निर्णय घेणार असल्याचे सांगून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी धमाल उडवून दिली.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले. आठवले यांनी काँग्रेससोबत यावे असे काँग्रेस आमदार नसीम खान यांनी एका कार्यक्रमात वक्तव्य केले. त्याचा धागा पकडत रामदास आठवले यांनी नंतर आपल्या भाषणात फटकेबाजी करत काँग्रेसलाही चिमटे काढले. रामदास आठवले म्हणाले, 'मी १०-१५ वर्षे काँग्रेससोबत होतो. त्यामुळे मला भाजपसोबतदेखील १५-२० वर्षे राहावेच लागणार. त्यामुळे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत भाजपसोबत राहणार आहे.' आपण हवेचा अंदाज घेत असून हवा कोणत्या दिशेने वाहत आहे त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला मंत्रिपदाची हाव नाही. माझे कार्यकर्ते तळागाळात असल्यामुळे मंत्रिपदाची चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले.