म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
रबाळे वाहतूक शाखेच्या हद्दीतील ठाणे-बेलापूर मार्गावर, रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरून मुलुंडकडे जाणाऱ्या टी जंक्शन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जात आहे. मुलुंड-ऐरोलीमार्गे ठाणे-बेलापूर रस्त्याला जोडणारा हा मार्ग मुख्य मार्ग आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर महामार्गावर नाशिककडून आणि गुजरातकडून येणारी वाहने फार असतात. शिवाय मुंबईतून ऐरोलीमार्गे पनवेल-पुणे आणि पुढे गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे. या मार्गावर अवजड वाहने, लहान-मोठ्या प्रकारची माल वाहतूक करणारी प्रवासी वाहने, खासगी वाहने यांचाही समावेश आहे.
या ठिकाणी टी जंक्शन येथे रस्त्याचे काम सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. शिवाय याचा फटका प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने या मार्गावर अधिसूचना जारी केली आहे. मुलुंड-ऐरोलीमार्गे ठाणे-बेलापूर मार्गावर येणाऱ्या आणि नाशिक, गुजरातकडून या मार्गावर येणाऱ्या जड-अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेश बंदी घोषित करण्यात आली आहे. या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून मुलुंड-ऐरोली मार्गे या मार्गावर येणाऱ्या वाहनांना आणि नाशिक, गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना, पनवेल, पुणे, गोवा याकडे जाणाऱ्या जड-अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोरील ठाणे-बेलापूर मार्गावरून भारत बिजली सिग्नल पटनी जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन एचपी गोदामासमोरून दिवागाव सर्कलवरून मुंबईमध्ये, तसेच ऐरोलीमार्गे येथे येणारी वाहने तिथूनच उलट दिशेने तिकडे जातील, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही अधिसूचना ५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे वाहतूकदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त सुनील लोखंडे यांनी व्यक्त केले.