नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करून परिसर विद्रुप करणाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाई तीव्र केली असून त्यांच्याकडून दंडही आकारण्यात येत आहे. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत ८४२ नागरिकांवर पालिकेने कारवाई केली. त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचा दंड वसूल केला. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन घनकचरा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी, रस्तेमार्गावर अस्वच्छता केल्यास २०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये दंड, उघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये दंड, उघड्यावर शौच केल्यास २०० रुपये दंड आकाराला जात आहे. दंडाची ही रक्कम वाढविण्यासाठी महासभेत प्रस्ताव आणला गेला होता, मात्र त्याला मंजुरी न मिळाल्याने आहे त्याच दरानुसार दंडवसुली केली जाणार आहे. मात्र नागरिकांनी कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, या अनुषंगाने आपली जबादारी ओळखावी आणि कारवाई टाळावी, असे आवाहन घनकचरा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात अली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले शहर स्वच्छ कसे राहील, याचा विचार करून कृती करावी, असे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांनी सांगितले.