विरोधकांचे आरोप...
सरदार वल्लभभाईंचे स्मारक उंच ठरण्यासाठी आटापिटा
उंची कमी करण्यासाठी समुद्री वाऱ्यांचे कारण न पटणारे
sanjay.vhanmane@timesgroup.com
@sanjayvMT
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही प्रचंड गदारोळ झाला. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक सर्वाधिक उंचीचे ठरावे यासाठी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाची उंची ३४ मीटरने कमी केल्याचा आरोप करत शुक्रवारी विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी तर राजदंडच उचलला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधानसभा विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांची बैठक घेऊन त्यांच्या सूचना मान्य केल्या जातील, असे सांगितल्यावर वातावरण शांत झाले.
विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची १६० मीटरवरून १२६ मीटरवर आणली आहे. शिवस्मारक हे जगातील सर्वांत उंच स्मारक असेल, अशी घोषणा सरकारने केली होती. मग आता अचानक उंची कमी करण्याचे कारण काय, असा सवाल पवार यांनी केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचेच स्मारक उंच राहावे यासाठी शिवस्मारकाची उंची खुजी करण्याचा धंदा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तर, उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
(वस्तुस्थिती समाजासमोर...६)