म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महागाई, शेतीमालाला भाव नसणे, तरुणांना कायमस्वरूपी रोजगार नसणे यावरून जनतेत सरकारविरोधात वातावरणनिर्मिती झाली आहे. हा विद्रोह थंड व्हावा आणि या मुद्द्यांकडे लोकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी भीमा-कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवाधिकार यासाठी लढणाऱ्या व्यक्तींना षडयंत्र करून अटक केले जात असल्याचा आरोप काही पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, न्यायाधीश, नेते यांनी केला आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, 'आप'चे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत, साहित्यिक डॉ. प्रज्ञा पवार, उर्मिला पवार, पत्रकार जतीन देसाई, 'नर्मदा बचाव'च्या नेत्या मेधा पाटकर, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, संपादक विद्या बाळ आणि विधान परिषदेतील आमदार कपिल पाटील यांचा समावेश आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे मुख्य सूत्रधार असून, या मूळ आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना मोकळे सोडले जात आहे. तसेच, फुले-बाबासाहेब आंबेडकर आणि संभाजीराजे यांची बदनामीही भिडे करत आहेत, असा आक्षेपही नोंदवण्यात आला आहे.
संपादक-लेखक आणि रिपब्लिकन पँथर्स संघटनेचे कार्यकर्ते सुधीर ढवळे, प्रख्यात मानवाधिकार वकील सुरेंद्र गडलिंग, राजकीय कैद्यांची सुटका करणाऱ्या समितीचे रोमा विल्सन (जेएनयूचे विद्यार्थी), महिलांच्या आदिवासींच्या अत्याचारप्रकरणी लढणाऱ्या प्राध्यापिका शोमा सेन (नागपूर) आणि पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेद्वारे आदिवासींमध्ये जमिनीच्या अधिकारासाठी काम करणारे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी महेश राऊत (गडचिरोली) यांच्या अटकेचा निषेध करत त्यांना विनाशर्त सोडावे, अशी मागणीही करण्यात येत आहे. या मागणीला साहित्यिक आनंद तेलतुंबडे, संविधान संवर्धन समितीचे सुरेश सावंत, नारी अत्याचारविरोधी मंचाच्या संध्या गोखले, सर्वहारा जनआंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन, प्राध्यापक रमेश कांबळे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या नजूबाई गावित यांनीही पाठिंबा दिला आहे.