म. टा. प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनेला चार अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाला असून, शिवसेनेचे संख्याबळ आता ६० आमदारांचे झाले आहे. येत्या दोन दिवसांत अनेक आमदार शिवसेनेला पाठिंबा जाहीर करणार असून, राज्यातील सत्तेच्या कॅनव्हासवर रंग भरण्यासाठीचा ब्रश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच हातात असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी स्पष्ट केले.
नाशिक पूर्व भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि निवडणुकीत पराभूत झालेले बाळासाहेब सानप यांनी रविवारी वांद्रे येथील मातोश्री बंगल्यात शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव यांनी सानप यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले. यावेळी भाजपने त्यांना असलेल्या २० आमदारांचे समर्थन दाखवावे, असे आव्हान राऊत यांनी मित्रपक्षाला दिले. शनिवारी रात्री प्रहार जनशक्तीचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी 'मातोश्री'वर जाऊन आपण शिवसेनेबरोबर असल्याचे जाहीर केले. यात ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. तसेच विदर्भातील रामटेकचे आशीष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे नरेंद्र गोंडेकर या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सेनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. या दोन्ही आमदारांना शिवसेना नेते अनिल देसाई यांनी 'मातोश्री'पर्यंत आणले. त्यामुळे नव्या विधानसभेतील शिवसेनेचे संख्याबळ ५६ वरून ६० झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये निवडून आलेले चंद्रकांत पाटील, तर इचलकरंजीत प्रकाश आवाडे हे शिवसेनेचे दोन बंडखोर असून, तेसुद्धा शिवसेनेच्या मागे जातील अशी शक्यता आहे. तसे झाल्यास शिवसेनेचे संख्याबळ ६२पर्यंत जाऊ शकते. ३० ऑक्टोबरला भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेता निवडीची बैठक मुंबईत होणार असून, त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत. दरम्यान, भाजपकडे १०५ आमदारांचे संख्याबळ असून, पक्षाला २० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे केले आहे. यात राजेंद्र राऊत (बार्शी), गीता जैन (मीरा-भाईंदर), महेश बालदी (उरण), मंजुळा गावित (साक्री), अनिल चौधरी (रावेर), किशोर जोरगवार (चंद्रपूर), विनोद आगरवाल (गोंदिया) यांच्यासह जनसुराज्य आणि रासपच्या प्रत्येकी एक आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.